शेतकरी संतप्त, संत्रा मोसंबीची फळे सिंचनाअभावी गळू लागली
वरूड : जोपर्यंत कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत कृषिपंपाचा वीजपुरवठा तोडू नये, असे निर्देश शासनाने दिल्यावरही वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र तालुक्यात आहे. वघाळ गावातील डीबी क्रमांक ६ चे ट्रान्सफार्मर ३ दिवसांपासून नादुरुस्त असून, ते दुरुस्तीकरिता गाडेगाव वीज वितरण कंपनी उपकेंद्राच्या अधिकाऱ्याने नकार दिल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहे.
वीजेअभावी संत्रा व मोसंबी बागांवर आंबिया बहराची फळे गळायला लागली आहे. सदर ट्रान्सफार्मरवर दोन फेज दाखवत आहे. त्यामुळे कृषीपंपाला पुरेशी वीजपुरवठा होत नसल्याने ते जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी गाडेगाव उपकेंद्र अधिकारी धनविजय यांचेशी संपर्क साधला. डीपी.क्र. ६ च्या वारंवार नादुरुस्तीच्या तक्रारी केल्या. जोपर्यंत या डीबीवरील कृषीपंपधारक शेतकरी वीज वितरण कंपनीच्या योजनेंतर्गत वीज बीले भरणार नाहीत तोपर्यंत या डीबीवरील ट्रान्सफार्मर दुरूस्ती न करण्याचे वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगत आहे. दुसरीकडे शासन कृषीपंपाची वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबविल्याचे विधानसभेत सांगत आहे. त्याअनुषंगाने नादुरुस्त ट्रान्सफार्मर त्वरित दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी पराग लांगापुरे, माजी सरपंच धनराज विंचूरकर, हर्षल वानखडे, महेश आंजीकर,चंदू कोहळे, खरे, विनोद हरले, विजय भोरे आदींनी केली आहे. ट्रान्सफार्मर दुरुस्ती करून कृषीपंपांना पुरेसा वीजपुरवठा करण्यास गाडेगाव उपकेंद्र अधिकाऱ्यांनी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत वाडेगावचे सरपंच तथा बाजार समितीचे संचालक सुधाकर दोड यांनी व्यक्त केले.
पान ३