दर्यापूर : तालुक्यात सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र १४,५६५ हेक्टर असून, सन २०२०-२१ मध्ये ९६३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. काही खासगी कंपन्यांकडून एरवी निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा होत असल्यामुळे पेरलं ते उगवलं नाही, ही समस्या शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजली आहे. त्यातच यावर्षी रोग व किडींचा प्रादुर्भाव, त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनची गुणवत्ता ढासळली असून, उत्पादनक्षमता खालावली आहे. त्यामुळे पुढील खरीप हंगामात बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यावर मात करण्यासाठी यावर्षी शेतातील उत्पादित सोयाबीन जपून ठेवण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकर यांनी केले आहे.
यावर्षी खरिपाच्या हंगामात शेतात सोयाबीनचे हिरवे पीक उभे होत असताना, अति पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर सोयाबीन काढणीच्या अवस्थेत असताना, परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे हातात आलेल्या सोयाबीनची गुणवत्ता ढासळली, तर उत्पादनक्षमता मंदावली आहे. महत्त्वाचे म्हणजे, काही कंपन्यांचे बियाणे शेतात पेरणीपश्चात उगवणक्षमतेत फेल ठरल्याच्याही घटना घडल्या आहेत. सोबतच खरेदी केलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीसुद्धा वाढल्या होत्या. अशा विविध कारणांमुळे पुढील हंगामात सोयाबीन बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अशात ज्या शेतकऱ्याकडे चांगले सोयाबीन आहे, त्यांनी ते बियाणे जतन करून ठेवण्याची गरज आहे. सोयाबीनच्या सर्वच जाती सुधारित असल्यामुळे दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे सोयाबीन आहे, त्यांनी घरच्या घरी उगवणक्षमता तपासून स्वत:ला आवश्यक असणारे व आपल्या स्वकीयांना लागणारे सोयाबीन राखून ठेवल्यास येणाऱ्या अडचणींवर मात करता येऊ शकते, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यासोबत दुसऱ्या गावातील शेतकऱ्यांनासुद्धा बाजारभावाने हे बियाणे विक्री केल्यास, त्यांनाही मदत होणार आहे. याकरिता शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी घरचे सोयाबीन जपून ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
बॉक्स :-
१० हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता
दर्यापूर तालुक्यात सोयाबीन पिकांचे अपेक्षित क्षेत्र १० हजार हेक्टर असून, त्यासाठी प्रतिहेक्टर १०० किलो बियाणे याप्रमाणे १० हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे. पुढील हंगामात येणारी बियाण्यांची संभाव्य टंचाई लक्षात घेता, तालुका कृषी विभागाने गत सप्टेंबर महिन्यापासून शेतकरी बांधवाला क्षेत्रीय स्तरावर मार्गदर्शन केले आहे.
कोट
यावर्षी रोग व किडीचा प्रादुर्भाव त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनची गुणवत्ता ढासळली असून, उत्पादनक्षमता खालावली आहे. त्यामुळे पुढील खरीप हंगामात बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर मात करण्यासाठी यावर्षी शेतातील उत्पादित सोयाबीन शेतकऱ्यांनी जपून ठेवावे.
- राजकुमार अडगोकर, तालुका कृषी अधिकारी, दर्यापूर