ठाण्यात परिवर्तन : शांतता समिती नव्याने गठित होणारअमरावती/अचलपूर : अमित बटाऊवाले यांची हत्या झाल्यानंतर ठाणेदारांच्या बदल्या झाल्यात. पोलीस ठाण्यात नेहमी दिसणारी गर्दी दिसेनासी झाली. ठाण्यातील ही गर्दी अचानक ओसरली कशी, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.रेती तस्करांनी अमित बटाऊवाले यांची हत्या करून मोहन बटाऊवाले यांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे पोलीस स्टेशनचे अनेक अलिखित नियम बदलले असल्याचे दिसून येत आहे. शांतता समिती बरखास्त करण्यात आली असून नव्याने ती गठित होणार आहे. पोलीस स्टेशनचा मागील तीन वर्षांत बारभाई कारभार झाल्यासारखा स्पष्ट दिसत होते. तत्कालीन ठाणेदार चक्षूपाल बहादुरे यांच्या केबीनमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी १० ते १२ खुर्च्या ठेवलेल्या होत्या. तेथे नेहमी जुगारी, सट्टेबाज, पत्तेवाले, अवैध गुटखाविक्रेते, भंगारवाले यांचेसह दलाल म्हणून ओळखले जाणाऱ्यांची भाऊगर्दी लोकांना दिसत होती. प्रतिष्ठित आणि शांतताप्रिय लोक चुकूनही दृष्टीस पडत नव्हते. बऱ्याच वेळा ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करण्याचीही कसूर बहादुरे यांनी सोडली नव्हती. पूर्वीच्या या चित्रात तूर्त परिवर्तन झालेले दिसत आहे. ठाणेदाराच्या केबीनमध्ये असलेल्या खुर्च्या गायब करण्यात आल्या आहेत. पोलीस ठाण्यात झालेल्या परिवर्तनाची चर्चा अचलपूर परिसरात सुरू आहे. (प्रतिनिधी)बहादुरेंच्या काळात अवैध धंदे फोफावले ठाणेदार बहादुरे यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्यात अवैध धंदेवाल्यांचा व एजंट म्हणून जनतेत प्रसिद्ध असणाऱ्यांचा वावर होता, हे चित्र नेहमीच दिसायचे. प्रतिष्ठित नागरिक ठाण्यात जात नव्हते. भाई लोक तर खुर्चीत दिसायचे. सध्यातरी त्याला ब्रेक बसला आहे, असे मत नगरसेवक नितीन डकरे, सतीश आकोलकर, माजी सरपंच दिलीप राऊत, नगरसेवक बाळासाहेब वानखडे, विनय चतूर, अनिल महाराज शर्मा, धर्मा यादव, गोविंद चरपटे, उत्तम साखरे, अभिजित सरोदे, नितीन भुयार, वर्षा हिरूळकर यांनी व्यक्त केले आहे.शहरातील रेती तस्करी, अवैध गुटखा, जुगार यावर खुफिया विभागाची नजर आहे. शांतता समितीत ज्यांचेवर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा लोकांना त्यातून काढून खरोखर प्रतिष्ठित व सुशिक्षित लोक घेण्यात येतील. शांतता समितीची सभा दर महिन्याला घेण्यात येईल. पोलीस आणि जनतेत समन्वय निर्माण करण्यात येईल. असामाजिक तत्त्व किंवा गुंड कुठल्याही जातीधर्माचा असो त्याची गय अजिबात केली जाणार नाही. दादागिरी करणाऱ्यांचीही माहिती घेऊन नोंद घेण्यात येत आहे.- नरेंद्र ठाकरे, ठाणेदार अचलपूर.हिंदू सणांदरम्यानच शहरात अराजकता का निर्माण होते? याचे मास्टर मार्इंड कोण आहेत, याचा शोध पोलिसांनी घ्यावा. यापूर्वी २००७ मध्ये देवी विसर्जन मिरवणुकीत दगडफेक कोणी केली? किंवा अशी वेळ कोण साधते याची मुळापासून पोलिसांनी चौकशी केल्यास सर्व प्रकार उघड होईल. बहादुरे यांच्या काळात कोणाची चलती होती, हे जनतेला सर्व माहीत आहे. - भोला चव्हाण,शहराध्यक्ष, भाजपा.
अचलपूरच्या पोलीस ठाण्यातील गर्दी ओसरली
By admin | Updated: August 25, 2015 00:37 IST