वनोजा बाग (अंजनगाव सुर्जी) : शेतकऱ्यांच्या शेतातून चोरलेल्या बोअरवेलचे केबल विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला अंजनगाव सुर्जी पोलिसांनी अभय दिल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला. स्थानिक पोलिसांच्या भूमिकेविरोधात पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्यांनी धाव घेतली आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, महिनाभरापासून भंडारज शिवारातून केबल सातत्याने चोरीला जात आहेत. यासंबधी तक्रार करण्यासाठी भंडारज येथील शेतकरी १४ फेब्रुवारी रोजी अंजनगाव ठाण्यात गेले, मात्र, त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. २५ फेब्रुवारी रोजी गावातीलच एका शेतकऱ्याने चोराला रंगेहाथ पकडले. यासंबंधी राजकुमार वानखडे यांनी १४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या लेखी तक्रारीवरून २७ तारखेला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे २५ फेब्रुवारी रोजी रंगेहाथ पकडलेल्या सतीश नामक व्यक्तीने चोरलेले केबल अंजनगावातील एका भंगार विक्रेत्याला विकत असल्याची कबुली शेतकऱ्यांसमोर दिली. तरीही त्या भंगार विक्रेत्याविरुद्ध पोलीस गुन्हा का दाखल करीत नाहीत, असा संतप्त सवाल करीत भंडारज येथील नागरिकांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. परिणामी, शेतकऱ्यांच्या दबावानंतर आरोपी सतीश रवींद्र राक्षसकर याच्याविरुद्ध भादंविचे कलम ११९, १५२, ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीवर राजकुमार वानखडे, प्रवीण गिते, नितीन पडोळे, ब्रिजमोहन शर्मा, शेख सलीम, हरिभाऊ बेंदरकर, गुणवंत गिते यांच्यासह ३० शेतकऱ्यांची स्वाक्षरी आहे.
कोट
ज्या भंगार विक्रेत्याकडे चोराने केबल विकला, त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. उलट प्रकरण दाबण्यासाठी आमिष देण्यात येते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन ठाणेदाराविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे.
- सागर हुरबडे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.
कोट२
आरोपी सतीश राक्षसकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी पोलीस कोठडीत आहे. चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्याचे नाव मिळताच त्याला सहआरोपी केले जाईल.
राजेश राठोड, ठाणेदार, अंजनगाव सुर्जी