पान २ ची बॉटम
परतवाडा : मेळघाटातील पस्तलई गावातील ९९ टक्के लोकांचे पुनर्वसन झाले आहे. पण पोलीस पाटलाचे घर, कुटुंब ते गाव सोडायला तयार नाहीत. त्यामुळे या कुटुंबाच्या पुनर्वसनाकरिता प्रस्तावानुसार प्राप्त ८५ लाखांचा निधी एक वर्षांपासून वन्यजीव विभागाकडे तसाच पडून आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अतिसंरक्षित क्षेत्रातील पस्तलई गावाचे २०१९ मध्ये अचलपूर तालुक्यातील येवता गावालगत पुनर्वसन करण्यात आले आहे. पस्तलईमधील १७८ कुटुंबांपैकी १७२ कुटुंबांचे येवता व वडगाव फत्तेपूरमध्ये पुनर्वसन झाले. मात्र, पस्तलईचे पोलीस पाटील लालमन धांडेकर व त्याचा भाऊ सखाराम धांडेकर आजही पस्तलईमध्येच वास्तव्यास आहेत. गावातील ९९ टक्के लोकांचे पुनर्वसन होऊनही पस्तलईचे पोलीस पाटीलपद लालमनकडेच आहे. आज या गावात केवळ लालमनचे एकच घर आहे. या कुटुंबाने पुनर्वसनाच्या ठिकाणी जाण्यास नकार दिल्याने त्यांच्यासाठी आलेला ८५ लाख रुपयांचा निधी संबंधित यंत्रणेकडे विनावापर पडून आहे.
दरम्यान, पस्तलई गावाच्या अनुषंगाने गावाकरिता श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेंतर्गत दिल्या गेलेले साहित्य वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या घरून जप्त केले आहे.
पोलिसांत तक्रार
पोलीस पाटील वनगुन्हा किंवा इतर गुन्ह्याची माहिती देत नाहीत. शासकीय कामात अडथळा आणतात. पस्तलई येथील पोलीस पाटील व त्यांचे भावाचे कुटुंब वगळता गावातील इतर कुटुंब येवता व वडगाव फत्तेपूर येथे पुनर्वसित झाले आहेत. केवळ दोन कुटुंबांकरिता पोलीस पाटीलपदाची आवश्यकता नसल्याची तक्रार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी चिखलदरा पोलीस ठाण्यात दिली आहे. यावर पोलिसांनी सहायक जिल्हाधिकारी धारणी यांना कळविले आहे.
वन्यजिवांची संख्या वाढली
पस्तलई गावाच्या पुनर्वसनानंतर त्या परिसरात वन्यजिवांची संख्या वाढली आहे. वाघ, गवे, सांबर, रानकुत्री दिसायला लागली आहेत. पस्तलईसमोर वाघाचे छायाचित्र कॅमेऱ्याने टिपले आहे.
कोट
पोलीस पाटलाच्या अनुषंगाने प्राप्त प्रस्ताव अचलपूर स्थित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव प्रलंबित नाही.
- मिताली सेठी, सहायक जिल्हाधिकारी, धारणी.