विकासकामांचे वाभाडे, पाणीपुरवठा, काँक्रीट रस्ते, स्मशानभूमीची दुरवस्था
धारणी : मेळघाटात ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येत असलेल्या विकासकामांचे वाभाडे निघत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान पटकावलेले रामू पटेल ऊर्फ भाऊसाहेब पटेल यांच्या गावालाही त्याची झळ पोहोचली आहे. त्यांच्या टेंभली या गावातील पाणीपुरवठा, काँक्रीट रस्ते, स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे.
धारणी मुख्यालयापासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावरील टेंबली हे गाव राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. माजी राज्यमंत्री स्वर्गीय रामू म्हातांग ऊर्फ भाऊसाहेब पटेल यांचे हे पैतृक गाव . या गावातील सद्यस्थिती अत्यंत विदारक आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना अंतर्गत या गावात समशानभूमी शेडचे नुकतेच निर्माण करण्यात आले. २५ फेब्रुवारी रोजी भाऊसाहेब पटेल यांचे निकटचे नातेवाईक आणि सहायक प्रकल्प अधिकारी यांच्या आईचे मृत्यू झाले. स्मशानभूमीवर चार-पाच लोक लाकडे जमा करण्यासाठी चढले असता, शेडमधील सिमेंट ओटा खचल्यामुळे सर्व जण त्या खड्ड्यात पडले आणि जखमी झाले. त्याबाबत युवक काँग्रेसचे वीरेंद्र पाण्डेय यांनी उपविभागीय अधिकारी मिताली सेठी यांच्याकडे तक्रार केली. विशेष म्हणजे, ठक्कर बाप्पा योजनेचे नियोजन व आर्थिक पुरवठा प्रकल्प अधिकारी कार्यालयतून केले जाते. याच कार्यालयात कार्यरत सहायक प्रकल्प अधिकारी यांच्याबाबत हा प्रकार घडला . त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
गावातील पाणीपुरवठा योजना बंद असल्याने टँकरद्वारे पाणी आणण्याची वेळ आली आहे. योजनेची मोटार जळाल्याची घटना वारंवार घडत आहे. यामागील षडयंत्र समोर आणण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याशिवाय ग्रामपंचायतीमार्फत आणि इतर योजनेंतर्गत काँक्रीट रस्ते आणि नालीची निर्मिती करण्यात आली. ते बांधकाम निकृष्ट आणि जागा अयोग्य असल्याने सांडपाणी गावातील रस्त्यांवरून वाहत आहे. या गावातील विविध विकास योजनांची स्वतंत्र चौकशी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
-