दसऱ्याचे औचित्य : ढोल-ताशांच्या गजरात बडनेराहून रवानाबडनेरा : दसऱ्याचा शुभमुहूर्त साधून बडनेरासह परिसरातील तृतीयपंथियांनी गीतांजली एक्सप्रेसच्या इंजीनला हार घालून तिची पूजा केली. तसेच ढोलताशंच्या गजरात गाडीला बडनेरा रेल्वे स्थानकाहून रवाना केले. प्रवासी रेल्वेगाड्यांमधून तृतीयपंथीयांना रोजगार मिळतो. देशभरातल्या रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथी नागरिक उपजिविकेसाठी फिरतात. प्रवाशांकडून पैसे मागून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळेच या गाड्यांच्या भरवशावर वर्षभर उदरनिर्वाह होत असल्याने कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता दसऱ्याच्या दिवशी तृतीयपंथी नागरिकांनी हा उपक्रम राबविला. बडनेराच नव्हे तर अमरावती, मूर्तिजापूर, अकोला, येथील तृतीयपंथियांनी एकत्र येऊन हा आगळा-वेगळा उपक्रम राबविला. बडनेरा स्थानकावर ढोल -ताशांच्या गजरात गीतांजली एक्सप्रेसचे स्वागत केले. इंजीनची पूजा करण्यात आली. गाडीला अधिक वेळ न थांबविता तृतीयपंथियांनी हा उपक्रम राबविला. त्यामुळे प्रवाशांची अडचण झाली नाही. तृतीयपंथियांनी रेल्वतील प्रवाशांना मिठाईचे वाटप केले. यावेळी शबनम, आम्रपाली, गुड्डी, तन्वी, शिल्पा, सीमा, खुशबू, महेक, राजकुमारी, मंगला आदींची उपस्थिती होती. गीतांजली एक्सप्रेसच्या चालकांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. दसऱ्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. यावेळी नवा उद्योग किंवा कोणत्याही उपक्रमाची सुरूवात केली जाते. त्यामुळे तृतीयपंथियांनी ज्या रेल्वेच्या माध्यमातून उदरनिर्वाह होतो, त्या रेल्वेचे पूजन करून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली. हा आगळा-वेगळा उपक्रम प्रवाशांनी देखील अनुभवला. (शहर प्रतिनिधी)
तृतीयपंथियांनी केले ‘गीतांजली एक्सप्रेस’चे पूजन
By admin | Updated: October 13, 2016 00:24 IST