व्यापारी संत्रा केव्हा तोडणार? :
वरूड : तालुक्यात यंदा मृग बहराचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संत्रा विकून इसार घेतला. व्यवहारदेखील ठरला. तोडणीची मुदतदेखील संपली. परंतु, पाऊस व गारपिटीने संत्रा झाडावरच राहिला. निसर्गाच्या बेभरवशामुळे संत्राउत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे.
तालुक्यात २० हजार हेक्टरवर संत्राबागा आहेत. कुणी आंबिया, तर कुणी मृग बहराचे उत्पादन घेतो. यावर्षी मृग बहराचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. संत्रा तोडणीची वेळ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी संत्रा विकला. कुणी टनाने, तर कुणी क्रेटने संत्रा विकला. टोकन म्हणून इसार घेऊन तोडणीची मुदत देण्यात आली. दरम्यान पाऊस व तुरळक गारपीटसुध्दा झाली. हवेमुळे काही संत्रा जमिनीवर आला. हीच संधी पाहून व्यापाऱ्यांनी मुदत संपूनही तोडणी केलेली नाही. यातच दिवसाआड मेघ दाटून येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाचा लहरीपणा पाचवीला पूजला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्याला झोप नाही. पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेल्या संत्राबागावरची फळे पाहून स्वप्न रंगविणारा शेतकरी तोडणीच्या प्रतीक्षेत आहे. ३८ ते ४० हजार रुपये टन व क्रेटला ७०० ते ८०० रुपये असा भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.