अमरावती : केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत आता संत्रापिकाला मंजुरी मिळालेली आहे. ही योजना सन २०२४-२५ पर्यंत राबविली जाईल. याकरिता जिल्ह्याला विविध वर्गवारीत २७ लक्ष्यांक प्राप्त झाले आहेत. ब्रँडिंग व बाजारपेठेसाठी प्रकल्प खर्चाचे ५० टक्के अनुदान देय राहणार आहे.
योजनेत वैयक्तिक शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरीगट, सहकारी उत्पादक संस्था यांना कृषिप्रक्रिया उद्योगाकरिता अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. यात प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान व सुविधांसाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देय राहणार आहे. योजनेंतर्गत १० लाखांपर्यंतचे प्रस्ताव राज्यस्तरीय समितीच्या मान्यतेने मंजूर केले जातील. त्यापेक्षा अधिक रकमेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नवीन उद्योगांबाबत जे वैयक्तिकरीत्या, स्वंयसाहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी उत्पादक संस्था या संत्रा पिकावर आधारित उद्योग करत असतील, तरच त्यांना साहाय्य केले जाणार आहे. सामाईक पायाभूत सुविधा तसेच उत्पादनाचे ब्रँडिंग व विपणन यासाठीचे अर्थसाहाय्य केवळ संत्रा पिकांवर आधारित उद्योगांनाच केले जाणार आहे.
याशिवाय प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेंतर्गत बीजभांडवल या योजनेंतर्गत स्वयंसाहाय्यता गटातील प्रत्येक सभासदाला ४० हजार रुपयांप्रमाणे बीजभांडवल व लहान उपकरणे खरेदीसाठी साहाय्य देण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकारात ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रस्ताव सादर करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन एसएओंनी केले आहे.
बॉक्स
उद्योग इतर पिकांचा असल्यास त्यालाही अर्थसाहाय्य
सध्या कार्यरत वैयक्तिक, स्वयंसाहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी उत्पादक संस्था यांच्याबाबत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचा दर्जावाढ, स्तरवृद्धी, विस्तारीकरण, आधुनिकीकरण भांडवली गुंतवणुकीकरिता संत्रा आधारित उद्योगांनाच प्राधान्य दिले जाईल. तथापि, कार्यरत उद्योग जर इतर पिकाचा असेल, तर त्यांनाही अर्थसाहाय्य केले जाणार आहे.
बॉक्स
या प्रकारात करता येणार अर्ज
जिल्ह्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गात वैयक्तिक उद्योगांचे १३, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी वैयक्तिक उद्योगाचे १, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी वैयक्तिक उद्योगाचे २ लक्ष्यांक प्राप्त आहेत. स्वयंसाहाय्यता गट ९, शेतकरी उत्पादन कंपनी १ व सहकारी उत्पादक संस्थांना १ चे लक्ष्यांक प्राप्त झाले आहे. परंतु, लक्ष्यांकापेक्षा अधिक लाभार्थी अर्ज करू शकत असल्याचे एसएओ म्हणाले.