भरारी पथक : दोन लाख ७० हजारांचे खाद्यतेल जप्त अमरावती : अंबानगरीत जुन्या पिंपांमध्ये कमी दर्जाचे खाद्यतेलाची विक्रीचा गौरखधंदा सुरू आहे. यासंदर्भात 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करून ही बाब लोकदरबारात मांडली होती. या वृत्ताची दखल घेऊन गुरुवारी दुपारी ४ वाजता अन्न व प्रशासन विभागाच्या भरारी पथकाने व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करून कमी दर्जाचे २ लक्ष ६८ हजार रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. अंबानगरीतल किरकोळ खाद्यतेल विक्रेते मोठ्या प्रमाणात जुन्या पिंपांमध्ये तेल भरून विक्री करण्याचा धंदा त्यांनी थाटला आहे. तसेच विविध प्रकारच्या ब्रँडमध्ये कमी दर्जाच्या खाद्यतेलाच्या विक्रीचा व्यवसाय अनेक दिवसांपासून फोफावला आहे. कमी दर्जाचे खाद्यतेल खाणे नागरिकांच्या जिविताला अतिशय हाणीकारक आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये असलेले मेसर्स भुवनेशर रिफाईन कॉटन आईल प्रा.लि. सी ३० या कंपनीमध्ये अधिकाऱ्यांनी कारवाई करुन २ लाख ६८ हजार ७५३ रुपयांचे तेलसाठा जप्त केला आहे. या आईल कंपनीतून भूमी व सुपर या नावाने कमी दर्जाचे तेल विक्री होत असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. त्या खाद्यतेलाच्या साठ्याचे वजन हे ३१०१ किलो गँ्रम ऐवढे होते. अन्न व प्रशासन विभागाचे सह आयुक्त एस. आर. केकरे व सहय्यक आयुक्त जयंत वाणे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे प्रमुख अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजीत शिंदे व अन्न सुरक्षा अधिकारी आर.एस. वाकडे यांनी ही कारवाई केली आहे. हा साठा जप्त करुन खाद्यतेलाचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. अन्न व सुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार कलम २६ (२) (व्ही), अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. खाद्यतेलाचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या नमुन्यामध्ये दोषी आढळले तर कंपनीच्या संचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व प्रशासन विभागाचे सहय्यक आयुक्त जयंत वाणे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
एमआयडीसीत अन्न प्रशासन विभागाची कारवाई
By admin | Updated: January 13, 2017 00:08 IST