अंजनगाव सुर्जी : शहरात जाण्याकरिता प्रमुख मार्ग असलेला डीपी रोड २० ते २५ दिवसांपासून नगरपालिकेने बंद केल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा व या मार्गाचे डांबरीकरण करावे, याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले.
धुळीचे कारण समोर करून हा मार्ग १ फेब्रुवारीपासून वाहतुकीस बंद केला आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला समांतर असल्याने बरेच नागरिक या मार्गावरून ये-जा करतात. धुळीने लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. मात्र, एकदम रस्ताच बंद करायचा का, असा सवाल उपस्थित करून नागरिकांच्या सोयीसाठी हा मार्ग लवकर मोकळा करावा व गणेशनगर परिसरातील नागरिकांचा धुळीमुळे होत असलेला त्रास वाचविण्याकरिता या रस्त्याचे लवकर डांबरीकरण करावे, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा प्रशासकीय अधिकारी गोविंद त्रिपुरारी यांना निवेदन सोपविताना देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अफसर बेग, रायुकाँचे शहराध्यक्ष अमरदीप कुकडे, विलास चाफले, विश्वजित मेतकर, निलेश सुने, माधव राऊत, सागर येवले, इरफान भाई, मंगेश पेढेकर, रुपराव इंगळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.