पोलिसांचा अंकुश नाही : घरफोड्या, दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणअमरावती : शहरात घरफोड्या व दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली असून चोरांवर पोलिसांचा वचक कमी झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस दिवसरात्र गस्त घालत असतानाही सोमवारी मध्यरात्रीत एकाच दिवशी तीन घरफोड्या, सहा दुचाकी व एक किरकोळ साहित्य चोरीची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमेतवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमरावती शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असताना गुन्हेगारसुध्दा स्मार्ट बनत असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे. शहरात १ हजारांवर पोलीस कर्मचारी दिवसरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत. मात्र, तरीसुध्दा दररोज घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे चोरांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात चोरांनी अपार्टमेंटमधील फ्लॅट लक्ष्य केले होते. दररोज चार ते पाच फ्लॅटमध्ये चोऱ्या व्हायच्या. सध्या तर सण व उत्सवांचे दिवस आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात सज्ज आहे. मात्र, तरीसुध्दा चोरटे सक्रिय आहेत. पोलीस सज्ज असतानाही चोरटे आपला डाव साधत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता आपल्या घराच्या सुरक्षेचा प्रश्न भेडसावत आहे. घराला कुलूप लावून बिनधास्त बाहेर जाणाऱ्यांना आता चोरांची भीती वाटू लागली आहे. दुचाकी वाहनधारकांना गाडी कोणत्या सुरक्षित ठिकाणी ठेवायची, हा प्रश्न पडत आहेत. शहरातील सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चोर सक्रिय आहेतच. तसेच आतील परिसरात घरासमोर ठेवलेल्या दुचाकीसुध्दा चोरी गेल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येक क्षणाला नागरिकांना चोरांची भीती बाळगावी लागत आहेत. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांना घराची तर शहरात फिरणाऱ्यांना दुचाकी चोरीची भीती वाटू लागली आहे. आता विश्वास करावा तर कुणावर, अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. त्यामुळे शहरात चोरांचे राज्य असल्याचे दिसून येत आहे. तीन घटनांत २ लाख २९ हजारांचा ऐवज लंपासशहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झालेल्या तीन घरफोडीच्या घटनांत तब्बल २ लाख २९ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रहिवासी सदाशिव नागोजी देवनाते (१७,रा. पत्रकार कॉलनी) हे कुटुंबीयांसह सोमवारी पितृमोक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरांनी घराचे कुलूप तोडून ४० हजारांचा सोन्याचा गोप, १० हजारांची सोन्याची अंगठी व २ हजार ५०० रुपयांची रोख लंपास केली. राजापेठ हद्दीतील गोपालनगर परिसरात घडली. तेथील रहिवासी गजानन पुडंलिक ढवळे हे घरात झोपले असताना चोरांनी उघड्या दारातून प्रवेश करून त्यांच्या पॅन्टच्या खिशातून १० हजार ५०० रुपये लंपास केले. तिसरी घटनेत गणेश कॉलनी येथील रहिवासी नीलेश धनशाम गांधी यांची पत्नी घराला कुलूप लावून नातेवाईकांच्या घरी जेवणाला गेल्या होत्या. दरम्यान अज्ञात चोरांनी घराचे कुलूप तोडून १ लाख ५६ हजारांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला आहे. सहा दुचाकी चोरीशहरात सोमवारी एकाच दिवशी सहा दुचाकीच्या घटना उघड झाल्या आहेत. राहुलनगरातील रहिवासी प्रमोद धाकडे यांनी सुंदरलाल चौकात उभी केलेली दुचाकी चोराने लंपास केली. पन्नालाल नगरातील रहिवासी अमित दीपक गुप्ता दुपारी दुचाकी उभी करून घरात गेले असता अज्ञाताने त्यांची दुचाकी लंपास केली. महावीर नगरातील रहिवासी प्रशांत तिडके हे पत्नीला दवाखान्यात सोडून आपल्या खोलीवर काही वस्तु ठेवण्याकरिता गेले होते. दरम्यान त्यांची दुचाकी उभी केली होती. मात्र, काही मिनिटांत खोलीसमोरील दुचाकी चोरी गेली. वृदावन कॉलनीतील रहिवासी रोशन मोहाडीकर यांनी राजापेठजवळील गुलशन मार्केटसमोर दुचाकी उभी केली होती. ती अज्ञात चोराने लंपास केली. शहर कोतवाली हद्दीतील चौधरी चौकात पांडुरंग धाखडे यांनी दुचाकी उभी केली होती. ती दुचाकी अज्ञाताने लंपास केली. दररोज शहरातील चार ते पाच दुचाकी चोरीला जात असल्याच्या घटना घडत असून पोलिसांचे 'डिटेक्शन' मात्र कमी असल्याचे स्पष्ट होत आहे.
शहरात एकाच दिवशी १० चोऱ्या
By admin | Updated: October 14, 2015 00:24 IST