फोटो - धारणी २८ एस तलाई येथील शेताचे प्रकरण, अभिन्यासधारकास पुढील व्यवहारावर बंदी, सहायक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धारणी : धारणी साझा अंतर्गत येत असलेल्या तलाई या गावातील शेत सर्व्हे नंबर ३५ ब जुना सर्वे नंबर १५४/१ क्षेत्रफळ १ हेक्टर ६२ आर या शेतीकरिता बनावट कागदपत्रांवर अकृषक परवानगी मिळविणाऱ्या अभिन्यासधारकास पुढील व्यवहार बंद करण्याचे आदेश सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिताली सेठी यांनी दिले. त्यांच्याकडे प्रलंबित अपिलामध्ये त्यांनी हे आदेश पारित केले. त्यामुळे शहरातील भूखंडधारकांचे धाबे दणाणले आहे.
धारणी शहराला लागून असलेल्या पूर्वेकडील अमरावती-बऱ्हाणपूर मुख्य मार्गावरील मौजा तलाई येथील हे बहुचर्चित शेत बहिणीने भावांना डावलून बनावट कागदपत्रांच्या आधारावर स्वतःच्या नावावर करून घेतले . त्यानंतर सदर जमिनीचे हस्तांतरण स्वतःच्या मुलीच्या नावाने करण्यासाठी पुन्हा बनावट दस्तावेजांचा आधार घेण्यात आला. यानंतर या शेताचे खोट्या दस्तावेजांच्या आधारे वर्ग-१ मध्ये समावेश व नंतर भूखंडांमध्ये रूपांतर करण्यात आले. यापैकी काही भूखंडांची विक्री सुद्धा करण्यात आली आहे.
मूळ मालक शेख बशीर शेख लाल यांनी या संपूर्ण प्रकरणाचे दस्तावेज काढून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे फेरफार नंबर १११ हक्क त्याग प्रकरण रद्द करण्याबाबत व शेत त्यांना परत मिळण्याबाबत अपील दाखल केले. यासोबतच शेख बशीर यांनी त्यांच्यासोबत झालेल्या अन्यायाविरुद्ध वारंवार धारणी पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदविली. मात्र, याकडे पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केल्यानंतर शेख बशीर यांनी धारणी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल करून चौकशीबाबत आदेश प्राप्त केले. धारणी पोलिसांना याप्रकरणी दोन महिन्यांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे न्यायालयाने आदेशित केले आहे .
दरम्यान, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणात शेख बशीर यांनी संबंधित शेताचा वाद प्रलंबित असतानाही खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याबाबत निदर्शनास आणून दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी १९ जानेवारी रोजी धारणी येथील दुय्यम निबंधक यांना पत्र देऊन सर्व्हे नंबर ३५ ब बाबत कोणत्याही प्रकारचे त्रयस्थ व्यक्तीला हस्तांतरण करण्याचे मनाई केली आहे.
त्यामुळे हे प्रकरण आता नवीन वळणावर आले आहे . या आदेशामुळे भूखंडधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न चालविला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते, याबाबत परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
फोटो कॅप्अशन - अमारावती बुरहानपुर मुख्य मार्गावरील येथील हेच ते वादग्रस्त शेत