अमरावती : जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग गुणवत्ता वाढविण्यासाठी कितीही प्रयत्न करीत असला तरी सद्यस्थितीत जिल्ह्यातील १४ पैकी तब्बल ९ पंचायत समितीत गटशिक्षणाधिकाऱ्यांचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. केवळ पाच पंचायत समितींचा अपवाद वगळता ही स्थिती असतानाच जून, जुलै महिन्यात या पाचपैकी चार नियमित गटशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने संपूर्ण जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागच प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर चालणार आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाचा शिक्षण विभाग व जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा गुणवत्ता वाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या रिक्त पदांमुळे कितपत यश येते हा या रिक्त पदांमुळे संशोधनाचा विषय ठरत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात १४ पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी यांची पदे महत्त्वपूर्ण आहेत. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा डोलारा सांभाळला जातो. जिल्ह्यातील आदिवासीबहुल मेळघाटसह इतर तालुक्यांत जिल्हा परीक्षण शिक्षण विभागामार्फत सुमारे १ हजार ६०२ शाळा आहेत. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा ढासळलेला शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे त्वरित भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय चित्र पालटू शकत नाही. (प्रतिनिधी)शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या नऊ पंचायत समितींमधील गटशिक्षणाधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे त्वरित भरण्याबाबतचा अहवाल राज्याच्या संबंधित विभागातील प्रधान सचिवाकडे पाठविण्यात आला आहे. ही पदे शक्य तेवढ्या लवकर भरण्याबाबतचा आपला प्रयत्न सुरू आहे. यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.- अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती.
प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर नऊ पंचायत समितींंची धुरा
By admin | Updated: June 5, 2015 00:33 IST