शासनाचे हमीभावाने शेतकऱ्याची थट्टा : एका वर्षात ४० रुपयांनी वाढसुमित हरकूट चांदूरबाजारसतत ३ ते ४ वर्षांपासून अस्मानी संकट व शासनाच्या धोरणामुळे आर्थिकदृष्ट्या रसातळला गेलेल्या शेतकऱ्यांची आस यावर्षीदेखील नैसर्गिक अकृपेमुळ वाया जात असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना आधार देणारे नगदी पीक सोयाबीन आता हाती येऊनदेखील होणाऱ्या सोयाबीनच्या उत्पन्नाची टक्केवारी पाहता त्याला आलेला खर्च निघणार की नाही या विवंचनांमध्ये सापडलेला असताना स्थानिक बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीचा शुभमुहूर्त करण्यात आले. या शुभमुहूर्तावर शेतकऱ्याला ३३५१ रुपये क्विंटल भाव मिळाले असले तरी होणाऱ्या उत्पन्नाला बघता खर्च निघनेही कठीण होत असल्याचे दिसत आहे. स्थानिक बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीच्या शुभमुहूर्तावर ब्राह्मणवाडा थडी येथील शेतकरी शरद जयपुरे यांनी आणलेले नवीन सोयाबीन सर्वप्रथम नवनिर्वाचित संचालक तथा अडते अमोल लंगोटे यांच्याकडे आल. या सोयाबीनला ३३५१ रुपये भाव देऊन स्थानिक व्यापारी पंकज नांगलिया, सुरेश नांगलीया, नीलेश चौधरी यांनी खरेदी केले. यावेळी बाजार समितीचे सचिव मनीष भारंबे यांनी सोयाबीनचे पूजन करुन शेतकरी शरद जयपुरे यांना टोपी, नारळ, दुपट्टयाने गौरविले. यावर्षी सोयाबीन आवक कमी राहणार अशी चर्चा व्यापारी वर्गामध्ये होती. तालुक्यातील सोयाबीनचे पीक पाण्याअभावी पिवळे पडत आहे. तालुक्यात सर्विकडेच सोयाबीनची शेंगा भरत असतानाच हे पीक रोगामुळे नष्ट झाले आहे. शासनातर्फे गतवर्षी सोयाबीनचे हमीभाव हे २५६० रुपये होेते. यामध्ये फक्त ४० रुपयांची किरकोळ वाढ करून यावर्षी २६०० रुपये शासनाने हमी भाव दिले. हे भाव एक तऱ्हेने शेतकऱ्यांची थट्टा करणारेच असल्याचे मत उपस्थित शेतकऱ्यांनी केले आहे.दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे चढ्या दराने भाव मिळतात, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन हे चांदूरबाजार समितीत विक्रीस आणावे.- मनीष भांरबे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती.
नवीन सोयाबीन बाजारात दाखल
By admin | Updated: September 22, 2015 00:18 IST