परतवाडा : अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेण्यासाठी राष्ट्रीय बँकेकडुन नाहक त्रास दिल्या जात आहे. परतवाडा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील एसबीआयच्या कृषी शाखेवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांनी शेतकऱ्यांसह जाऊन धडक दिली. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे कर्ज नामंजूर करण्यात आल्याने त्याचा जाब यावेळी विचारण्यात आला.
शासनाने पीक कर्जमाफी केली असली तरी त्याच प्रमाणात शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. कर्जासाठी विविध दाखले आणि कारणे दाखवून कर्जप्रकरणे नामंजूर केली जात आहेत. यासंदर्भात गुरुवारी सायंकाळी काही शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांना यासंदर्भात तक्रार केली होती. त्यांनी त्याची तत्काळ दखल घेत संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला तसेच त्या दूर करून शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याची मागणी केली. १६० शेतकऱ्यांचे प्रस्ताव पोस्टाने परत पाठवून कर्जप्रकरणे नामंजूर करण्यात आली. त्यामध्ये अचलपूर तालुक्यातील रासेगाव, गौरखेडा, मल्हारा, वडगाव फत्तेपूर, येवता आदी गावांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
कोट
कर्ज प्रकरणांसाठी आवश्यक दस्तावेज असलेल्या शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास बँकेकडून दिला जात नाही. रद्द करण्यात आलेली प्रकरणे तात्काळ तपासून त्यावर निर्णय घेतला जाईल.
- मो. इकबाल हुसैन, शाखा व्यवस्थापक, एसबीआय कृषी विकास शाखा, परतवाडा
कोट
कर्ज प्रकरणात खासगी दलालांच्या हस्तक्षेपामुळे पात्र शेतकऱ्यांना डावलण्यात आले आहे. बँकेत जाऊन व्यवस्थापकाशी चर्चा केली. बँकेशी संलग्न नसलेल्या गावांतील शेतकऱ्यांना कर्ज देऊन इतरांना त्रास दिला जात आहे. त्यावर लवकरच निर्णय घेऊन न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
- सुरेखा ठाकरे, नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस