पान २ चे लिड
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : सर्वाधिक खड्ड्यांमुळे अपघातप्रवण झालेल्या नागपूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती केली जाणार आहे. त्या कामाची जबाबदारी भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कडे सोपविण्यात आली आहे. या २८५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीकरिता ८४.१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
नागपूर-औरंगाबाद-सिन्नर-घोटी-मुंबई या ७५३-सी राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती १८ वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाने केली. त्यानंतर शासनाने दोन वर्षांपूर्वी या महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती. एकीकडे नागपूरहून मुंबईला जाणारा नागपूर-मुंबई क्रमांक ६ हा राष्ट्रीय महामार्ग अमरावती अकोला खामगाव पर्यंत अद्यापही नादुरुस्त आहे. त्यात रस्त्याने टोल अधिक पडत असल्यामुळे सर्वाधिक जड वाहतूक ही नागपूर-औरंगाबाद या महामार्गााने होते, नव्हे तर ती या मार्गाने वळविली गेली. त्यामुळे रस्त्यावर अधिक खड्डे पडले. त्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली. आतापर्यंत दीडशेच्या आसपास लोकांना खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात प्राण गमवावे लागले. या रस्त्यावरील वाढत्या अपघातांमुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी हा महामार्ग भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे सोपविला आहे.
रस्त्याची संपूर्ण डागडुजी
भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरणाने मंजूर ८४.१५ कोटी रुपयांत जालना ते पुलगाव अशा २८५ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात केली आहे. खड्ड्यामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेल्या मेहकर ते लोणार या कामाला युद्धस्तरावर सुरुवात झाली. अमरावती जिल्ह्यातील ३४ किलोमीटरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प विभागाने एक वर्षांपूर्वी पूर्ण केले आहे. मात्र, त्याव्यतिरिक्त खड्डे असल्याने भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण दुसऱ्या टप्प्यात पुढील आठवड्यात जिल्ह्यातील कामाला सुरुवात करणार असल्याचे प्राधिकरण विभागाने सांगितले.
१२५ पुलांचे होणार ऑडिट
अठरा वर्षांपूर्वी बांधलेल्या नागपूर-औरंगाबाद या मार्गावरील काही ठिकाणी पुलांची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे या महामार्गावरील १२५ पुलांची स्थिती पाहण्यासाठी एक पथक नुकतेच या मार्गावर येऊन पाहणी करून गेले. सर्व पुलांचे ऑडिट करण्यात येणार करून, त्याबाबतचा अहवाल शासनाला दिला जाणार आहे.
कोट
जालना ते पुलगाव या २८५ किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात अमरावती जिल्ह्यातील रस्त्याची दुरुस्ती करून हा मार्ग खड्डेमुक्त करण्यात येणार आहे. दरम्यान, पुलाच्या ऑडिटलाही गती आली आहे.
बी. एम. कसबे
उपविभागीय अभियंता
भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण
-------------