नांदगाव खंडेश्वर : नगरपंचायतींच्या क्षेत्रात असणाऱ्या २५८ पारधी कुटुंबांच्या घरांपैकी ७० घरांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. इतर घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना व वस्ती सुधार योजनेतून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतींचा विकास करणे आवश्यक आहे. यासाठी नगरपंचायतींचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
विश्रामगृहात शुक्रवारी ना. कडू यांनी नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीचा आढावा घेतला. पाणीपुरवठ्यासाठी जीवन प्रधिकरणाकडे पाठपुरावा करावा तसेच चौदाव्या वित्त योजनेतून पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा. वस्ती सुधार योजनेतून रस्ते, नाल्यांचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. घरकुल पूर्ण करण्यासाठी रेतीचा प्रश्न येत आहे. यासाठी घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींनी अर्ज केल्यास त्याला पास देण्याची सुविधा दिली जाईल. गेल्या तीन वर्षांपासून अपंग कल्याणचा निधी वितरित करण्यात आलेला नाही, हा निधी लवकरच वितरित करण्यात येईल. स्मशानभूमीमध्ये विजेची सुविधा नसल्याने याठिकाणी तातडीने वीजपुरवठा करण्यात येईल, असेही कडू यांनी बैठकीत सांगितले.