अमरावती : अमरावती वनविभागात अतिशय संवेदनशील आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या वरुड नजीकच्या शेकदरी वन वर्तुळातून काही दिवसांपूर्वी १५ ते २० चंदनाच्या झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र, चोरीचे पुरावे नष्ट करण्यासाठी मुळासकट ती काढण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बंंगल्यातून चंदन झाडांच्या चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शेकदरी वनवर्तुळातून ४० ते ५० से.मी. गोलाई आकाराच्या चंदन झाडांची कटाई करुन ही झाडे मध्यप्रदेशात पाठविण्यात आली आहेत. शेकदरी वन वर्तुळात चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. हे वन वर्तुळ अतिशय संवेदनशिल असतानासुध्दा येथे वनपाल म्हणून महिलेची नियुक्ती करण्यात आली. हे वनविभागाचे अपशय मानले जात आहे. शेकदरी वनवर्तुळ मलईदार असून येथूनच मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात वनतस्करी केली जाते. याच भागात सॉ मील अधिक आहेत. त्यामुळे शेकदरी वनवर्तुळात वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनी चंदन झाडांच्या चोरी संदर्भात भेटी देण्याचे ठरविले आहे. दिवसेंदिवस चंदन चोरीचे प्रकरण चर्चेत येत आहे
चंदन झाडांच्या चोरीचे पुरावे नष्ट करण्याच्या हालचाली
By admin | Updated: December 4, 2014 23:01 IST