अचलपूर : अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यात १९२ कृषिपंपाच्या रोहित्रावर अतिरिक्त जोडणी देणाऱ्या विद्युत अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यासह रासेगाव येथील निरपराध शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी गुरूवारी सकाळी ११ वाजता येथील उपविभागीय कार्यालयावर प्रहार पक्ष व शेतकऱ्यांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यातील १९२ रोहित्रांवर अतिरिक्त वीज जोडणी देण्यात आली. त्यासाठी प्रत्येकी ३० ते ४० हजार रूपये शेतकऱ्यांकडून घेण्यात आले. तर चार ते पाच वर्षांपासून काही शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली नाही. १९२ डीबीवर अतिरिक्त जोडणीसाठी कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. अतिरिक्त जोडणीमुळे तालुक्यामध्ये कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे. तर दुसरीकडे पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना सिंचन करून पिके वाचवावी लागत आहेत. शेतकऱ्यांना मुबलक वीज मिळत नाही आदी मागण्यासाठी प्रहार व शेतकऱ्यांनी गुरुवारी प्रहारचे बल्लू ऊर्फ महेंद्र जवंजाळ यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. परतवाडा शहरातील नेहरू मैदान येथून निघालेला मोर्चा दयालघाट, अंजनगाव चौक जयस्तंभ मार्गे उपविभागीय कार्यालयावर धडकला. उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना बल्लू जवंजाळ, प्रवीण पाटील, अविनाश सुरंजे, मंगेश देशमुख, संतोष किटुकले, अजय तायडे, राजेश सोलव, सुरेश गणेशकर, संजय तट्टे, अजय राऊत, प्रशांत आवारे, दीपक धुळधर, गजानन मोरे, राजेश वाटाणे, श्याम अग्रवाल, गजू हिवसे, महेश सुरंजे, बंटी ककरानीया, छोटू ढोरे, गोपाल शेळके, शिवबा काळे, श्याम श्रीवास्तव, साहेबराव मेहेरे, भास्कर मासुदकर, पंजाब बेदरकर आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. विद्युत अभियंत्यावर आठ दिवसांत निलंबनाची कारवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून प्रहारतर्फे देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्रहारचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा
By admin | Updated: July 31, 2015 00:50 IST