अमरावती :‘आई मला खेळालला जायचंय’... जाऊ देनं वं!’ हीच खरे तर बालसुलभ प्रवृत्ती. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सुटीचाही अतिरेक झाला. त्यामुळे मुले शाळेत जाण्यासाठी आसुसली असताना २७ जानेवारीपासून शाळा सुरु होऊनही पालकांच्या नकारामुळे ५० टक्के विद्यार्थी घरीच आहेत. कोरोनामुळे पालकांच्या मनात धाकधूक असली तरी मुले शाळेत जाण्यासाठी पालकांकडे हट्ट करीत आहे.
२३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले तर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. ग्रामीण भागात शाळांमध्ये चांगला प्रतिसाद आहे. त्यातुलनेत शहरी भागात शाळांमध्ये अल्प प्रतिसाद आहे.या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे उदाहरण समोर आले नाही. मात्र, गत तीन ते चार दिवसापासून कोरोना संक्रमित रुग्णाची आकडेवारी १०० ओलांडत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढत आहे. पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाले असून, जून महिन्यात होणारी शालेय खरेदी आता जानेवारीमध्ये होत आहे. शहरी भागात नवे दप्तर, नवे गणवेश घेण्याची धडपड पालकांनी सुरु केली आहे. ग्रामीण भागात मुलांना समग्र शिक्षा अभियानातील गणवेशाचे वेध लागले आहे. परंतु, मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हे अद्यपाही पालक ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. ५० टक्क्यापेक्षा अधिक पालकांनी शाळांना संमतीपत्र दिलेच नाही, हे वास्तव आहे. पाचवी ते आठवीची ७३८१६ पटसंख्या आहे.
-------------------
पाचवी ते आठवीचे विद्यार्थी
पाचवी : २२४३०
सहावी: १९८५०
सातवी: १६२६७
आठवी: १५२६८
----------------------
कोरोना नियमावलींचे पालन करीत वर्ग सुरू
नववी ते बारावीचे वर्ग सुरू करताना जी नियमावली लागू होती, तीच नियमावली पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करताना शाळा व्यवस्थापनाने लागू केली आहे. सनिटायझर, ऑक्सीमिटर, थर्मल गनचा वापर करुन विद्यार्थी सुरक्षितता हाताळली जात आहे.
----------------
विद्यार्थी काय देत आहेत कारणे?
- शिष्यवृत्ती व नवोदयच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी पाचवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जायचे आहे
- संपूर्ण वर्ष सुटीत गेले आता केवळ दोन महिन्यासाठी शाळा कशाला, असा प्रश्न काही विद्यार्थी विचारत आहे.
- हिवाळी संपून आता उन वाढू लागले आहे. मग ऐन उन्हाळी सुटीच्या काळात आम्हाला शाळेत कशाला बोलावता, असाही काही जणांचा प्रश्न आहे.
---------
कोट
शाळेत सर्व सुविधा आहे. त्यामुळे शाळेत जाण्यास काहीही हरकत नाही. पण आता एवढे दिवस वाया गेलेच आहे.तर केवळ दोन महिन्यांसाठी शाळा कशाला, आता उन्हाळाही सुरू हाेणार आहे. दरवर्षी या काळात आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्या मिळत असतात. यंदा मात्र वेगळेच आहे.
- प्रणाली रमेश जाधव, इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी
कोट
आजवर बंद असलेली शाळा सुरू झाल्याचा आनंद आहे. आता मला माझ्या मित्रांना भेटता येणार आहे. मात्र, कोरोनाची भीती आईवडिलांना असल्यामुळे तूर्तास शाळेत जाण्यास मनाई करीत आहे. काही दिवस ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवणार आहे. वर्गात जाऊन शिक्षण घेण्याची खूप इच्छा आहे. पण कोरोनाचे संकट गेले नाही.
-प्रशांत विलास राठोड, इयत्ता सहावीचा विद्यार्थी
कोट
माझ्या आईबाबाने हमी पत्र भरून दिले नाही. त्यामुळे मला शाळेत जाता येणार नाही. आता घरी राहून कंटाळा आला आहे. वर्गात माझे काही मित्र जात आहे. वडिलांच्या नकारामुळे शाळेत अध्ययनासाठी जाऊ शकत नाही. लवकर कोरोना हद्दपार व्हावा आणि नियमित शाळेत जाता यावेे.ऑनलाईन शिक्षण काही भावत नाही.
- आर्यन राजेश वानखडे, इयत्ता सातवीचा विद्यार्थी
कोट
शाळा सुरू होणार असल्याने खूप आनंद झाला. यावर्षी शाळा भरलीच नाही, तर कसेतरी वाटत होते. पण आता शाळेत जाण्याबाबत झाल्या इतर मैत्रिणी, त्यांचे आईबाबा काय ठरवितात हेही पहावे लागणार आहे. शाळा सुरू होऊन सहा दिवस झाले. इतर सर्व शाळेत जाणार असतील, तर मीही जाण्याचा विचार करेन.
- चुटकी प्रमोद रोकडे, इयत्ता आठवीची विद्यार्थिंनी