आम्ही हिंदू नाही काय ? : आंदोलने बेदखल करणाऱ्या शासनावरही नाराजीअमरावती : प्रथमेश नरबळीच्या मुद्यावरून दुखावलेल्या मातंग समाजाच्या कोअर कमिटीची वैचारिक बैठक रविवारी धामणगावात पार पडली. धर्मांतरणाच्या मुद्यावर या बैठकीत गंभीर विचारमंथन करण्यात आले. या मुद्याला निर्णायक वळण देण्यासाठी लवकरच नागपुरात बैठक होईल, अशी विश्वसनीय माहिती आहे. प्रथमेश हा मातंग समाजाचा अर्थात् हिंदू मुलगा. शिक्षणासाठी त्याला शंकर महाराज यांच्या आश्रमातील वसतिगृहात प्रविष्ठ करण्यात आले. तेथे नरबळीच्या उद्देशाने त्याचा गळा कापण्यात आला. या भयंकर मुद्यावर कधी नव्हे तो मातंग समाज संघटित झाला. अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी पेटून उठला. समाजबांधवांचे राज्यभरातून समर्थन या लढ्याला लाभले. हातावर कमविणे आणि पानावर खाणे, अशी समाजाची आर्थिक स्थिती असली तरी महिनाभरापासून हा समाज प्रथमेशला न्याय मिळावा, यासाठी चिकाटीने लढतो आहे. मातंग समाजाच्या या तीव्र लढ्याची भाजप सरकारने जराही दखल घेतली नाहीच; शिवाय आता या समाजाला आणि मातंगांच्या लढ्याला हिणवण्याचे कार्य सुरू झाले आहे. मातंगांंनी उभारलेला लढा हिंदू धर्माविरुद्ध आहे, अशी टिंगल टवाळी केली जात आहे. ‘हिंदू दलित’ म्हणूनच आम्ही जगतो आहोत. आम्ही हिंदू आहोत, हे आम्हाला सांगण्याची गरज निर्माण व्हावी, यापेक्षा वेदनादायी काय असावे, अशा वेदना या बैठकीत व्यक्त करण्यात आल्यात. आमच्या समाजाचा मुलगा- प्रथमेश हा हिंदू नाही काय? त्याचा गळा चिरला, मग हिंदू धर्माच्या मुलाचा गळा चिरण्यात आला नाही काय? त्याच्या शरीरातील ज्या रक्ताने नरबळीसाठी पूजा करण्यात आली; ते रक्त हिंदू मुलाचे नव्हते काय? भाजप शासनाला, त्यांच्या मंत्र्यांना, हिंदूंचा अभिमान बाळगणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे मान्य नसेल तर हिंदू असणे म्हणजे नेमके काय, आम्ही कसे वागलो म्हणजे हिंदूंचा अपमान होणार नाही, आंदोलनात आम्ही नेमकी कोणती मागणी केली म्हणजे हिंदूंची मने दुखावणार नाहीत, हे तरी त्यांनी आम्हाला सांगावे, असा भावनावेश धामणगावातील बैठकीत तीव्रतेने व्यक्त झाला. आश्रमाचे सर्वेसर्वा शंकर महाराज हे आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने कायदेशीररीत्या आणि नैतिकदृष्ट्याही प्रथमेश नरबळीप्रकरणी दोषी आहेत. त्यांनी प्रथमेशची विचारपूसही केली नाही. उलटपक्षी प्रथमेश जेथे इलाज घेतो आहे, तेथे आश्रमाचे ट्रस्टी नियमित जातात आणि नातेवाईकांना धमकावतात, विरोध केल्यास अंगावर धावतात, प्रथमेशच्या खोलीत चोरून शिरतात, शंकर महाराजांच्या चरणी जाण्याचा सल्ला देतात, हे सारे शंकर महाराजांच्या आदेशानेच होत आहे. प्रथमेशला संपविण्याचा कुटील डाव आहे. केवळ आमचा समाज डोळ्यात अंजन घालून प्रथमेशच्या रक्षणार्थ तैनात असल्याने त्यांचे अपकार्य साध्य होऊ शकले नाही. आमचा समाज शंकर महाराजांची दहशत वारंवार अनुभवतो आहे. शंकर महाराजांच्या आदेशावरूनच नरबळीचे प्रकार घडले, हा समाजाचा आणि प्रथमेशच्या नातेवाईकांचाही प्रमुख आरोप आहे. त्यासाठीच आम्ही शंकर महाराजांच्या अटकेची मागणी करीत आहोत. काय चुकले आमचे?मातंगांनी न्याय मागू नये काय ?अमरावती : आमच्या मागणीची शासनाने महिनाभरापासून दखल तर घेतली नाहीच, शिवाय शंकर महाराजांचे लोक दमदाटी करीत सुटले आहेत. आम्ही हिंदूविरोधी आहोत, असे जाहीर वक्तव्य करीत आहेत. सवर्ण मंडळी मातंग समाजाला हिंदू मानत नाहीत, हेच यातून स्पष्ट होते. हिंदू धर्माचे समर्थक असलेले शासनही अन्याय झालेल्यांच्या नव्हे, अन्यायकर्त्यांच्या पाठीशी उभे ठाकले आहे. आम्ही मातंग नसतो तर शासन आश्रमाच्या पाठीशी उभे ठाकले नसते, अशा भावना या बैठकीत व्यक्त झाल्यात. शासनाचे मंत्रीद्वय प्रवीण पोटे आणि रणजित पाटील यांच्या भूमिकाही मातंगविरोधी आणि आश्रमानुकूल असल्याचे वैचारिक प्रहार या बैठकीत झाले. 'मातंगांची मुले बळी देण्यासाठीच जन्माला आली आहेत. आश्रम इतक्या जणांना पोसतो, मग एखादा कापला तर काय झाले,' अशा अत्यंत आक्षेपार्ह आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचविणाऱ्या भाषेत आश्रमातील कर्मचारी, भक्त बाहेर बोलत आहेत. फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. अन्याय करूनही मातंगांना हिनवले जाते, तरीही ते चूप आहेत, असा सूरही या बैठकीत उमटला. दोन तासांहून अधिक वेळ ही बैठक चालली. ज्या धर्मात आम्हाला स्थान नाही, जो धर्म आम्हाला आपले मानत नाही, अन्यायाविरुद्ध दाद मागितल्यास आम्हाला जेथे हिंदूविरोधी ठरविले जाते, सरकार बघ्याची भूमिका घेते, भाजपचे मंत्री मुलाची चौकशीही करीत नाही, वारंवार भेटी घेतल्यानंतरही मुख्यमंत्री मुद्दामच दुर्लक्ष करतात, आमच्या संघर्षाची टिंगल केली जाते, अशा धर्मात रहायचेच कशासाठी, असे नाना प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आलेत. या बैठकीचा 'अंडरकरन्ट' लागल्यामुळे इतर काही धर्माच्या लोकांमध्ये मातंग समाजाच्या या अस्वस्थतेची मोठी चर्चा सुरू झाली. या लक्षवेधी बैठकीला धामणगाव तालुक्यातील सात, यवतमाळ जिल्ह्यातील तीन, वाशिम जिल्ह्यातील दोन पुरुष आणि एक महिला, कारंजा लाड येथील दोन, वर्धेचे दोन, आर्वी तालुक्यातील चार आणि नागपूर जिल्ह्यातील तीन महत्त्वपूर्ण समाजनिर्णायक व्यक्ती उपस्थित होत्या. धामणगाव हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महत्त्वाचा प्रदेश मानला जातो. ही बैठक नेमकी धामणगावात आयोजित करण्यात आली होती, हे येथे उल्लेखनीय.
दुखावलेल्या मातंग समाजाची धर्मांतरणाच्या मुद्यावर बैठक
By admin | Updated: September 5, 2016 00:12 IST