नियोजन बैठक : मोर्चा होणार 'रेकॉर्ड ब्रेक' दर्यापूर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे १३ जुलैला घडलेल्या नृशंस घटनेचा निषेध करण्यासाठी आणि मराठा आरक्षणाची मागणी बुलंद करण्यासाठी २२ सप्टेंबर रोजी मराठा समाज बांधव अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. हा मोर्चा परभणीपणे रेकॉर्डब्रेक होण्यासाठी मराठे एकवटले आहेत. त्या अनुषंगाने २२ सप्टेंबरला निघणाऱ्या या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी गुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहात नियोजन बैठक घेण्यात आली. बैठकीत नियोजनासह पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी शिस्तबध्दपणे मराठा क्रांती मोर्च्याची हाक दिली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून समाजाचे अन्य प्रश्न आणि अडचणी प्रशासनासमोर मांडल्या जाणार आहेर. या मोर्चात तरुण, महिला, उद्योजक, शेतकरी, नोकरदार, व्यावसायीक, कामगार, सामाजिक राजकीय कार्यकर्ते सहभागी होणार आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर बैठकांना जोर आला आहे.दर्यापूर येथे झालेल्या या बैठकीलाही तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठी हजेरी लावली. यावेळी स्वप्निल धोटे, मंगेश काळे, अभिजित देवके, बाळासाहेब वानखडे, गजानन वाकोडे, अभय गावनडे, नमित हुतके, अतुल गोळे, दिलीप रहाटे, गोपाल अरबट, रेखे, मनोज तायडे आदींसह मराठा समाजबांधवांची उपस्थिती होती. तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
मराठा समाजबांधव एकवटला
By admin | Updated: September 10, 2016 00:17 IST