समस्या : स्थलांतरित मतदारांनी उडवली झोपअमरावती : गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे ग्रामीण भागात कमी झालेल्या रोजगाराच्या संधी आणि इतर काही कारणांमुळे ग्रामीण भागातील अनेक मतदार रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतरित झाले आहेत. या विस्थापित मतदारांना परत आणून त्यांचा उपयोग कसा करून घ्यावा? अशा पेचात उमेदवार अडकले आहेत. एका कुटुंबातील चार ते पाच मतदार असल्याने त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी कसे आणावे? त्यांना आणण्यासाठी खर्चही अधिक येणार असल्याने काय करावे? असा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडले आहेत. ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अनेक इच्छूक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यापैकी अनेकांना तर आतापासूनच सरपंचपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. प्रत्येक जण निवडून येण्यासाठी व्यूहरचना आखून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे. तसेच आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत. त्यापैकी आपल्या जवळचे कोण? याबाबत मतदार याद्यांची तपासणी केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक मतदार रोजगाराच्या शोधात तसेच अन्य कारणामुळे गाव सोडून शहरात गेले आहेत. त्यामुळे या मतदारांची मते कशी मिळावावीत?, याची तडजोड सुरू आहे. दुरावलेली मते प्रत्येकालाच हवी असल्याने हालचाली सुुरू आहेत. उमेदवारांमध्ये संभ्रमविस्थापित मतदारांना आणण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च येणार आहे. खर्च करूनही त्यांचे मत मिळेलच याची शाश्वती उमेदवाराला बाळगता येत नाही. दुसरीकडे विरोधकांनी या मतदारांना आणले तर त्याचे पारडे जड होईल, अशा विचाराने उमेदवारांची झोप उडाली आहे. त्यामुळे विस्थापित मतदारांचे काय करावे? असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार संविधनाने दिला आहे. त्यामुळे मतदान करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विस्थापित मतदारांनीही आपले कर्तव्य समजून मतदानास आले पाहिजे.-जयकृष्ण सहारे,मतदार
रोजगारासाठी अनेक मतदार बाहेरगावी; उमेदवार चिंताग्रस्त
By admin | Updated: July 23, 2015 00:06 IST