पोलीस दल 'टाईट' : अधिकारी श्रेणीतील पहिली विकेटगणेश देशमुख - अमरावतीशहर पोलीस दलात आज सर्वत्र एकच वाक्य ऐकू येत होते. 'देखना भाई, सीपी साहब भेस बदलकर आयेंगे'. आपापले कर्तव्य चोखपणे बजावण्याचा ज्याचा त्याचा प्रयत्न होता. पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला अचानक कोणत्याही वेशात दाखल होऊ शकतात. कर्तव्यात कसूर दिसला तर लागलीच निलंबनाची कारवाई होऊ शकते, हे भय प्रत्येकच पोलीस अधिकाऱ्याच्या मनात आज दिसले. अधिकाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठने त्यामुळे कमालीची उंची गाठलेली जाणवली. चोरांनी, घरफोड्यांनी अमरावतीकरांचे जगणे कठीण केल्यावरही सहज वागणाऱ्या पोलिसांना 'लोकमत'ने 'दहशत चोरांची' या वृत्तमालिकेतून खडबडून जागे केले. 'सीपी साहेब एक करा, वेशांतर करून शहरात फिरा', वृत्तमालिकेतील या एका भागातून सीपींनी स्वत: बाहेर फिरणे कसे आवश्यक आहे, हा मुद्दा 'लोकमत'ने लोकदरबारात मांडला होता. सुरुवातीला वेगळे प्रयत्न करून गुन्हे रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या पोलीस आयुक्तांनी नंतर या वृत्तमालिकेची संवेदनशीलपणे दखल घेतली. आतापर्यंत केबिनमधून कारभार चालविणारे सुरेशकुमार मेकला म्हणूनच अचानक केबिनमधून बाहेर पडले.शिस्त अशीच कायम असावीसाध्या वेशात बेमालूमपणे ते शहरात फिरले. पोलीस ठाणी, पोलीस चौक्या आणि शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. पोलीस आयुक्त शहरात फिरताहेत ही बाब जराही 'लिक' होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी मेकला यांनी घेतली. सीपी नेमके कुठेकुठे गेलेत, याची अचूक महिती पोलीस दलात अजूनही कुणाचकडे नाही. पूर्वी पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेतून शहरातील कायदा व सुव्यवस्था बघणाऱ्या पोलीस आयुक्तांनी ज्यावेळी स्वत:च्या नजरेतून शहर बघितले, त्यावेळी ते अवाक् राहिले. बाहेर सर्वच आलबेल असल्याचे सांगणारे अधिकारी त्यांची कर्तव्ये कशी निभावतात, याचा अनुभव आयुक्तांनी स्वत: घेतला. कर्तव्य बजावण्याऐवजी झाडाखाली सावलीत विश्रांती घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची पहिली विकेट त्यांनी तत्काळ घेतली. राजापेठ पोलीस ठाण्याचा हा अधिकारी नाकाबंदीदरम्यान सावलीत वेळ मारून नेत होता. चोरी, घरफोडीच्या घटनांनी पोलिसांना मान वर करणेही कठीण झालेले असताना, सर्वाधिक घरफोड्या होणाऱ्या राजापेठच्या अधिकाऱ्याने कर्तव्याप्रती अशी आस्था ठेवावी, हे पोलीस आयुक्तांना जराही रूचले नाही. तत्क्षण निलंबनाची कारवाई त्यांनी केली. लोकभावनेला फारकत देऊन आतापर्यंत अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारे सीपी अधिकाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेबाबत आता सतर्क झाले आहेत. जे-जे कामचुकारपणा करतील, त्या सर्वांना शासन होईलच, असा स्पष्ट संकेतच पोलीस आयुक्तांनी या कठोर कारवाईतून दिला. आयुक्तांना आता अख्खे शहर त्यांच्या नजरेतून बघायचे आहे. पोलीस ठाण्यांमध्ये काय चालते ते हेरायचे आहे. गस्त कोण कशी करतात, याचा हिशेब ठेवायचा आहे. का वचकत नाहीत चोर पोलिसांना, याच्या मुळाशीच त्यांना शिरायचे आहे. आयुक्तांचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. 'जाँबाज' पोलीस अधिकाऱ्यांची पाठ थोपटायलाच हवी, कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार व्हायलाच हवा; परंतु जे बेजबाबदार आहेत, त्यांनाही शासन झालेच पाहिजे, ही लोकभावना आहे. पोलीस आयुक्तांच्या बदललेल्या प्रशासनपद्धतीतून ती प्रतिबिंबित होऊ लागली आहे. पोलीस आयुक्तांनी मारलेल्या साध्या वेशातील, साध्या वाहनातील फेरफटक्यामुळे अख्खे पोलीस दल कमालीचे सतर्क झाले आहे. ज्याला त्याला आता आपापल्या हद्दीत गुन्हे न होण्याची, कर्तव्य चोखपणे बजावण्याचीच चिंता आहे. अधिकाऱ्यांच्या मुखातील 'सीपी कुछ नही करते यार' हे पूर्वीच्या वाक्याची जागा आता 'ड्युटी करो, वरना सीपी साहब नोकरी छिन लेंगे' या वाक्याने घेतली आहे. पोलीस दलाचा प्रभाव शिस्तीशिवाय पडत नाही. पोलीस आयुक्तांनी निर्माण केलेली ही शिस्त आता कायम राखण्याची गरज आहे. सीपींचे हे गोपनीय दौरे आणि पोलीस अधिकाऱ्यांवर निर्माण झालेला हा वचक अमरावतीच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. शिस्तीसोबत त्यामुळे कर्तव्यनिष्ठा वाढेल. रिझल्टही येतील. या त्रिसूत्रींवर चालणारा कारभार शहरवासीयांना खात्रीलायक सुरक्षा प्रदान करू शकेल.
'देखना भाई, सीपी साहब भेस बदलकर आयेंगे!'
By admin | Updated: June 23, 2014 23:37 IST