शहरातील बँकांमध्ये गर्दी नसली तरी बाहेर नागरिकांच्या रांगा लागतात. एटीएममध्ये मात्र अगदी एकमेकांना खेटूनच रांगेत लोक असतात. सोशल डिस्टंसिंगबाबतचे नियम ग्राहक पाळत नसून, यातील एखादी व्यक्ती जरी बाधित असली तरी यामुळे कोरोना संक्रमणास कारणीभूत ठरू शकते. विशेष म्हणजे, एटीएममध्ये सॅनिटायझरचा वापरच होत नाही. शासकीय बँक तसेच खाजगी बँकेतर्फे याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही.
कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. मात्र, काही लोकांनी पाहिजे त्या प्रमाणात काळजी घेतलेली नाही. असाच निष्काळजीपणा बँकांच्या शाखा व्यवस्थापकांनी घेतला आहे. शहरातील नेताजी चौक, स्टेट बँक चौकासह सर्व एटीएमवर निर्जंतुकीकरण, ग्राहकांसाठी सॅनिटायझेशनचीकोणतीही सुविधा नाही.
ग्राहकांना न हाताळल्याबाबत दुकानदारांना दंडित केले जाते, त्याप्रमाणे कोरोनासंबंधी नियमांचे पालन न करण्याबाबत बँक व एटीएम केंद्रांवर कारवाई केली जावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.