श्यामकांत पाण्डेय धारणीशहरात एका आंतरजातीय विवाहाची सार्वजनिक वाच्यता होताच सर्वधर्मियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरजातीय विवाहाविरुध्द सामूहिक जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध धर्मातील समाजबांधवांनी बैठका घेणे सुरू केले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक शनिवारी पार पडली. यात प्रत्येक धर्मातील समाजबांधवांनी हा प्रकार निंदनीय व असमर्थनीय असल्याची तीव्र भावना व्यक्त केल्यात. याच अनुषंगाने सोेमवारी स्थानिक समाज मंदिरात गावकऱ्यांनी एका सभेचे आयोजन केले. बौध्द विहारातही बुध्दप्रेमी अनुयायांची सभा संपन्न झाली. शहरात अलिकडे घडलेल्या घटनांमुळे धर्मा-धर्मातील सौहार्दता अडचणीत आली आहे. या प्रकारामुळे प्रत्येक धर्मातील पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. प्रत्येकजण एक दुसऱ्याकडे संशयाच्या नजरेने बघतो आहे.धारणी हे संवेदनशील व सर्वधर्म समभाव जपणारे छोटे शहर आहे. येथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द व शिख धर्मिय एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने नांदतात. परंतु आंतरधर्मीय विवाहाच्या घटनेने संबंधातील हा संवेदनशीलपणा प्रभावित झाला आहे. याबाबत सर्वच धर्मातील नागरिक बांधवांनी बैठका घेऊ न चिंता व्यक्त केली आहे. मेळघाटात भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी कठोर पाऊले उचलण्याचे ठरविण्यात आले. मुला-मुलींच्या भवितव्याबाबत मेळघाटातील पालकवर्ग कमालिचा जागृक झाल्याचे बघायला मिळत आहे.
आंतरधर्मीय विवाहांनी वाढविली चिंता
By admin | Updated: March 18, 2015 00:21 IST