अमरावती : सध्याचे २१वे शतक हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या शतकातच सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारी संस्कृती उदयास येणार असून ‘विश्वबंधुभाव’ हा भारताच्या संस्कृतीचा पाया असल्याने भारत जगातील महासत्ता म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन परम संगणकाचे जनक विजय भटकर यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी चिंतन कार्यक्रमातून विजय भटकर संबोधित करीत होते. ते म्हणाले, सुपर कॉम्प्युटर क्षणात गणिताच्या कोट्यवधी किचकट प्रक्रिया करतो. असेच कार्य राष्ट्रसंतांच्या सामुदायिक ध्यान व प्रार्थनेतून होते. जगात १० हजार वर्षांत अनेक संस्कृती उदयास आल्या व लोपदेखील पावल्या. परंतु भारतीय संस्कृती अद्याप जिवंत आहे. आम्ही त्याचे वारसदार आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे.चिंतन कार्यक्रमापूर्वी भटकर यांच्या हस्ते राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे पूजन करण्यात आले. सामुदायिक ध्यानानंतर राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची शोभायात्रा व मानवसेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांचा टाळ पदन्यास, लेझीम व दिंडी काढण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रसंतांची खंजेरी भजने होतात. या सर्वांचा एकत्रित मेळ घालण्याकरिता या महोत्सवात शनिवारी खंजेरी भजन संमेलन दोन दिवस व दोन सत्रांत आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय सकाळी सामुदायिक ध्यान, चिंतन, योगासन व प्राणायाम, ग्रामगीता प्रवचन, सामुदायिक प्रार्थना, कीर्तन आदी कार्यक्रमही होतील. (प्रतिनिधी)
भारत महासत्ता होणार!
By admin | Updated: October 15, 2016 03:36 IST