संशयकल्लोळ : महसूलची कारवाई थंडबस्त्यात
धारणी : तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचे हिरवे स्वप्न दाखविणारा गडगा मध्यम प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेक शासकीय बांधकामे रेती व मुरुमाअभावी बंद असताना या प्रकल्पाला रेती व अन्य गौण खनिज कसे उपलब्ध होते, हा कळीचा व संशोधनाचा मुद्दा आहे.
या प्रकल्पात मोठ-मोठ्या नेत्यांचे स्वार्थ दडले असल्याने कारवाई होत नसल्याची ओरड आहे. कोणत्याही कामासाठी शासनाकडून गिट्टी, मुरूम आणि रेती उपलब्ध होत नसताना या प्रकल्पावर हजारो ब्रास गौण खनिज कोणत्या निकषावर उपलब्ध होत आहे, हे रहस्य उलगडणेसुद्धा आवश्यक आहे. या प्रकल्पावर होत असलेल्या गौण खनिज वाहतुकीबाबत महसूल विभागाकडून अनेकदा कारवाई करण्यात आली. मात्र, दबाव आल्याने कारवाईची धार बोथट झाल्याची वस्तुस्थिती आहे. गडगा मध्यम प्रकल्प निश्चितपणे धारणी तालुक्यातील शेतऱ्यांसाठी वरदान ठरू शकते. मात्र, त्याची निर्मितीच वादविवादातून होत असल्यास या प्रकल्पाबद्दल भविष्य अंधकारमय असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे चित्रिकरण करण्यास पूर्णपणे मनाई असून, या प्रकल्पाच्या परिसरात ‘कोई भी परिंदा पर नही मार सकता’ अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था बांधकाम कंत्राटदाराने केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे रहस्य अधिकच गडद होत चालले आहे.
बॉक्स
‘ती’ चर्चाही व्यापक
देशात गाजलेल्या बहुचर्चित सिनेअभिनेते सुशांत सिंह राजपूत यांच्या तथाकथित आत्महत्या प्रकरणाशी निगडित गोव्यातील एका व्यक्तीचा या प्रकल्पस्थळाशी संबंध असल्याची मोठी चर्चा राज्यभरात झडली. या प्रकल्पावरसुद्धा प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचा वावर होता, असे बोलले गेले. त्यामुळे हा प्रकल्प ‘मिस्ट्री’ बनू पाहत आहेत. त्यामुळे गडगा मध्यम प्रकल्पाची इत्यंभूत चौकशी होणे आवश्यक आहे.
पुन्हा प्रतीक्षाच पदरी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रस्तावित १९ फेब्रुवारी रोजीचा दौरा काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आला. ते या दौऱ्यादरम्यान गडगा मध्यम प्रकल्पाची पाहणी करणार होते, असे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले होते. तशा पूर्वतयारीलादेखील वेग आला होता. मात्र, दौरा रद्द झाल्याने पुन्हा एकदा गडगा मध्यम प्रकल्पाची चौकशी बारगळली आहे.
असा होता आरोप
तालुक्यातील गडगा मध्यम प्रकल्पात सुरू असलेले सदोष व निकृष्ट बांधकामामुळे तालुक्यातील ५० गावांना भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. गडगा नदीत नियमबाह्य तथा अनैसर्गिक खोदकाम केल्याचा आरोप युवा स्वाभिमानचे मेळघाट विधानसभा प्रमुख व संपर्क प्रमुखांनी केला होता. त्यांनी याबाबत सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना निवेदन वजा तक्रार दिली होती. मात्र, त्या तक्रारीवरदेखील पुढे काय झाले, हे गुलदस्त्यात आहे.
-------------