जसापूर ग्रामपंचायत, पदभार सांभाळण्यापूर्वी जोपासली बांधीलकी
चांदूर बाजार : तालुक्यातील जसापूर येथील एका विधवा महिलेवर फायनान्स कंपनीचे १ लाख ४० हजारांचे गृहकर्ज होते. ते कर्ज महिलेच्या पतीने आठ वर्षांपूर्वी घेतले होते. परंतु दीर्घ आजाराने दोन वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. परिणामी फायनान्स कंपनीचे कर्ज थकीत राहिल्याने कंपनीकडून दोनदा या महिलेच्या घरावर जप्ती आली होती. नवनिर्वाचित सरपंच वैशाली प्रदीप बंड यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्या महिलेला मदतीचा हात देऊन तिचे घर जप्ती होण्यापासून वाचविले.
जसापूर येथील रिना सुनील खुळे यांच्या पतीने ८ वर्षांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. २०१८ साली पतीचे निधन झाले. कर्जाचा बोजा वाढत गेला. सदर महिलेकडे हातमजुरीशिवाय उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नाही. त्यातूनच ९२ वर्षीय सासरे, ८५ वर्षीय सासू व स्वत:चा ८ व १० वर्षीय दोन मुलीचा उदरनिर्वाह करणे जिकिरीचे ढाले होते. कर्जाचा आकडा वाढून १ लाख ४० हजार रुपयांवर पोहोचला. ते कळताच सरपंच वैशाली बंड या पती प्रदीप बंड यांच्यासह राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे गेल्या. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मध्यस्ती करीत कंपनीसोबत बोलून जप्ती थांबवली. तसेच व्याजासह कर्जाच्या एकूण रकमेतून १ लाख १२ हजार ८४० रुपये कर्ज कमी करून घेतले. तडजोडीनंतर राहिलेले २८ हजार रुपयांची रक्कम भरण्याची क्षमता ही या विधवा महिलेची नव्हती. यामुळे नवनिर्वाचित सरपंच वैशाली बंड यांनी स्वत: सरपंचपदाचा पदभार स्वीकारण्या अगोदर थकीत रकमेचा भरणा केला. व कंपनीकडून कर्ज नील झाल्याचा दाखला सदर विधवा महिलेला सुपूर्द केला. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच कांचन भोतमांगे, ग्रामपंचायत सदस्य किशोर खडसे, सुवर्णा मातिकाळे, दुर्गा मोहेकर, यांच्या उपस्थितीत सदर विधवा महिलेला कर्ज नील झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.