धामणगाव रेल्वे : खासदारांना लाखोचे वेतन, आमदारांना आपल्या मतदारसंघासाठी भरीव निधी, जिल्हा परिषद सदस्यांना प्रवासभत्ता, सरपंचांना वार्षिक उत्पन्नाप्रमाणे मानधन. मात्र, ग्रामपंचायत सदस्यांना प्रत्येक मासिक सभेला केवळ दोनशे रुपये बैठक भत्ता, एक कप चहा मिळतो. ही चेष्टा कधी थांबणार, असा सवाल धामणगाव तालुक्यातील ५५० ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित केला आहे.
७३ व्या घटना दुरुस्तीनंतर ग्रामपंचायती विकासाचे मुख्य केंद्रबिंदू बनल्या. आज ग्रामपंचायतीला थेट निधी येतो. या निधीतून लाखो रुपयांची कामे ग्रामस्तरावर होत आहेत. मात्र, परंतु ग्रामपंचायत सदस्यांना निवडणुकीसाठी हजारो रुपये खर्च करूनही हातात मात्र महिन्याकाठी दोनशे रुपये मिळतात. गावाचा विकास आराखडा तयार करताना तसेच शासनाच्या लोक कल्याणकारी योजना राबविताना ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेणे गरजेचे असते. एखादी तहकूब मासिक सभा असल्यास ग्रामपंचायत सदस्यांना कळविण्यात येत नाही. सचिव अनेक वेळा ग्रामपंचायत सदस्यांना कार्यालयात बसण्यासाठी खुर्चीही देत नाही, अशी भावना सदस्य व्यक्त करीत आहेत.
कधी घेणार सकारात्मक भूमिका?
महानगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रातील सदस्यांना वाढीव मानधन देण्यात येते. त्यांना रहिवासी, परिचय दाखला देण्याची मुभा आहे. परंतु ग्रामपंचायत सदस्यांना अशाप्रकारचे कोणतेच अधिकार नाही. ७३ व्या घटनादुरुस्तीत ग्रामीण भागाचा विकास झाला. केंद्र शासनाने ग्रामपंचायतींना अधिकारसुद्धा दिले. आता ग्रामपंचायत सदस्याकडे सकारात्मक भूमिकेने पहावे, असे मत सदस्यांनी व्यक्त केले आहे.
कोट १
गावाच्या विकासात आमचा मोलाचा वाटा आहे. मात्र, प्रशासन सकारात्मक दृष्टिकोनातून आमचा विचार करीत नाही. आम्हाला किमान एक हजार रुपयांच्या मासिक मिटींगमध्ये भत्त्याची शासनाने तरतूद करावी.
- अतुल नेहारे,
सदस्य, ग्रामपंचायत, सोनेगाव खर्डा
--------
पान २ ची बॉटम