अमरावती : प्रहार पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वामध्ये मोर्शीतील शेकडो घरकुल लाभार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बुधवारी धरणे आंदोलन केले. अतिक्रमण नियमानुकूल करण्याची त्यांची मागणी आहे. शासन निर्णय २०११ पूर्वीचे शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे शासनाने जाहीर केले होते. यादरम्यान मोर्शी नगर परिषद हद्दीत ९६३ लाभार्थींना शासनाने घरकुल मंजूर केले. त्यामधील ३२१ लाभार्थी अतिक्रमणधारक होते. यामधील १९४ अतिक्रमण पात्र असून, त्याबाबत प्रस्ताव जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. परंतु, अतिक्रमण नियमानुकूल करून घरकुलाचा लाभ देण्याबाबत अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे, या मागणीसाठी मोर्शी शहरातील अतिक्रमणधारक जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचे धरणे प्रदर्शन करण्यात आले. शासनाने याबाबत निर्णय न दिल्यास पंधरा दिवसांनी राहुटी आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी मोर्शी येथील नगरसेवक नईम खान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव फुके, प्रहार विद्यार्थी संघटनेचे रवि परतेती, दानिश अहमद, समीर खान, जावेद हुसेन,अब्दुल इर्शाद, शकूर शाह, मनोज इडपाची, सुनीता कुमरे, इकबाल सय्यद, अनिल कुईटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मोर्शीतील घरकुल लाभार्थींचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST