धारणी : शहरात रविवारी संचारबंदीची व्यापक अंमलबजावणी झाल्यानंतर सोमवार सकाळपासून मात्र शहरात लोकांनी एकच गर्दी केली. भारतीय स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र बँकेसमोर खातेदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाकडे धारणीवासीयांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते. त्रिसूत्रीचे पालन न केल्यास लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्यामुळे धारणीकरांना त्रिसूत्रीऐवजी लॉकडाऊनची प्रतीक्षा आहे की काय? अशी गर्दी धारणीत अनुभवायला मिळाली. अमरावती व अचलपूर नगरपालिका क्षेत्रात सोमवार रात्रीपासून लॉकडाऊन लागल्याने आपल्याकडेही लागेल, या भीतीने लोक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले. तर बँकाही सोमवारपासून बंद राहतील, अशी चर्चा झाल्याने गर्दीत भर पडली.