लोकमत चमूलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यातील काही गावांत तुफानी गारपीट झाली. वादळवासह कोसळलेल्या अकाली पावसाने दोन्ही तालुक्यातील गहू, संत्रा, मोसंबी व गंजी करून ठेवलेल्या चण्याचे मोठे नुकसान झाले. धारणी व तिवसा तालुक्यातही शनिवारी अकाली पाऊस झाला. परतवाडा : अचलपूर तालुक्यातील मल्हारा, वज्झर, बुरडघाट, काळवीट, म्हसोना, गौरखेडाकुंभी, नर्सरी, धामणगाव गढी, एकलासपुर, धोतरखेड्यासह लगतच्या परिसरात २० मार्चला सायंकाळी ४ ते ४.३० वाजताच्या दरम्यान वादळी वाºयासह गारपीट झाली. काही ठिकाणी हरभऱ्याएवढी, काही भागात बोराच्या आकाराच्या १५ ते २० मिनिटे गारा पडल्या. यात गहू, संत्रा, कांदा, पिकाचे नुकसान झाले. सिद्धक्षेत्र बहिरमसह कारंजा बहिरम, सफार्पूर, सायखेड मध्येही गारपीट झाली आहे.शुक्रवार १९ मार्चला सकाळी ११ ते ११.३० चे दरम्यान वादळी पावसासह चमक, सुरवाडा, खांबोरा, चांचोडी, तुळजापुर जहांगीर, देवरी, पोही, नायगाव भागातही तुरळक गार पडली. यातही कांदा व गव्हाचे पीक बाधित झाले. काहींचे गहू सोंगल्या गेले असून काहींना गहू ओंबीवर शेतात उभा आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने गहू झोपला आहे. संत्रा झाडावरील बार गळले आहेत. गौरखेडा, वज्झर, धामणगाव गढीसह लगतच्या पिरसरात २० मार्चला गार पडली आहे. वादळी वाऱ्यासह गारपीटीमुळे झालेले शेतमालाचे नुकसान प्रत्यक्ष पाहणीनंतर सोमवार पर्यंत पुढे येईल. यात शेत पिकाचे नुकसान झाल्याची माहिती अचलपूर तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव यांनी दिली.ब्राह्मणवाडा थडी परिसरात गारपीटीने संत्रा कोलमडलाब्राह्मणवाडा थडी : ब्राह्मणवाडा थडीसह परिसरातील शिरजगाव, करजगाव, वणी, सर्फापूर, अलमपूर, सोनोरी, विश्रोळी भागांत शनिवारी वादळी वाºयासह पाऊस व गारपीट झाली. या पाच ते दहा मिनिट झालेल्या गारपिटीमुळे हरभरा, गहू, कांदे, भाजीपाला, संत्रा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
तिवसा तालुक्यात अवकाळी पावसाचा कहरतिवसा : सलग दोन दिवस कोसळलेल्या अकाली पावसाने तिवसा तालुक्यात हातातोंडाशी आलेल्या गहू, कांदा या पिकांची पार दाणादाण उडाली. चक्रीवादळाने संत्रा झाडे सुद्धा जमीनदोस्त झाले आहेत. तालुक्यात शुक्रवारी व काही भागात शनिवारी वादळी पाऊस व गारपीट झाली. यात मुसळधार पावसामुळे सोंगणीला आलेला गहू व सोंगणी करून ठेवलेला हरभरा पार पावसात भिजला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या अवकाळी पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. तर उन्हाळामध्ये घेतला जाणारा कांदा पिकासह संत्राचे देखील नुकसान झाले आहे. भारसवाडी, शेंदुरजनाबाजार व धामंत्री येथे मोठे नुकसान झाले आहे.
शिरजगाव भागात पाच मिनिटे कोसळली गार शिरजगाव कसबा/चांदूरबाजार / करजगाव: चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा परिसरात दुपारी तुफान वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे अनेक शेतातील गहू, कांदा तसेच आंबा संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवघ्या पाच मिनिटाच्या आलेल्या गारीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिसकावून घेतलेला आहे. येथील किराणा व्यावसायिक संतोष राठी यांनी गारा जमादेखील केल्या. सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या अनेक गावांना गारपिटीचा तडाखा बसला. चांदूर बाजार तालुक्यातील वणी, नागरवाडी, बेलखेडा भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे.
धारणीत पावसाची हॅटट्रिक धारणी : येथे सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. गुरुवारपासून अवकाळी पावसाचा सुरू झालेला खेळ शुक्रवारी सकाळी आणि दुपारी सुरू राहिला. तर, शनिवारी पुन्हा संध्याकाळी पाच वाजतापासून मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. बैरागड परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सवंगणीवर आलेला गहू आणि हरभऱ्याचे पीक खराब झाले. सुदैवाने गारपीट न झाल्यामुळे सध्यातरी रबी हंगामाचे पीक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.