वरूड : कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत असल्याने रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक शनिवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ८ पर्यंत संचारबंदी आणि जमावबंदी आदेश जारी केल्याने नागरिकांना लॉकडाऊन राहावे लागणार आहे. विवाह सोहळा आता २५ लोकांमध्ये पार पाडण्याची मर्यादा घालून दिली आहे.
लग्नप्रसंगाला शनिवार, रविवार वगळता परवानगी देण्यात येणार असून, अन्य समारंभांवर बंदी घालण्यात आली आहे. विवाह सोहळ्याच्या परवानगीकरिता वधू-वरांसह २५ वऱ्हाडींची कोरोना तपासणी केल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि यादी जोडणे बंधनकारक आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रतिष्ठाने उघडी ठेवण्यास मुभा राहील. प्रवासी, नागरिक, ग्राहक आणि सेवा देणाऱ्या प्रत्येकाला मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा लागेल. कायद्याचे पालन केले नाही, तर कारवाई केली जाईल, अशी तंबी प्रभारी तहसीलदार देवानंद धबाले यांनी दिली आहे. जमावबंदी आणि संचारबंदी आदेश असल्याने चार वा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, अन्यथा फौजदारी कलम १४४ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल. हॉटेल, उपाहारगृह, बारमधून केवळ पार्सल सुविधा राहील. मास्क घातल्याशिवाय बाहेर पडणे तसेच दुचाकी, चारचाकीमध्ये मास्क घालूनच प्रवास करावा, असे प्रभारी तहसीलदार देवानंद धबाले यांनी सांगितले.