बेशरमचे रोपण, छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेचे आंदोलन
मोर्शी : तालुक्यातील पाळा ते भिवकुंडी मार्गातील खड्ड्यांत बेशरमची झाडे लावून पाळा येथील छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेने या मुद्द्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
पाळा ते भीवकुंडी रस्ता नव्याने करण्यात येऊन रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यानिमित्त निवेदनातून उपविभागीय अधिकाऱ्यांसह पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले. त्यानुसार, भिवकुंडी हे गाव आदिवासीबहुल क्षेत्रात असून, दररोज पाळा मार्गे मोर्शीला पायी वा सायकलने ये-जा करावी लागते. उपचाराकरिता मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय गाठावे लागते. परंतु, भिवकुंडी ते पाळा मार्ग अतिशय खराब झाला असून, जागोजागी या रस्त्याला खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी-चारचाकी चालकांना या रस्त्याने वाहन नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे तातडीने रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रेणीत राऊत, अंकित ठवळी, विजू सिरसाम, भूपेश राणे, अभिजित मोहने, अजय युवनाते, अमोल निस्वादे, गोलू मधापुरे, नितेश गोडबोले, विकी उईके, अविनाश युवनाते, सागर राऊत, जगदीश झरबडे, अनिकेत थेटे, अंकित गोहाड, विनीत उबाळे, वैष्णव चिंचोळकर, दीप खंडारे, अजय उईके, अविनाश भलावी उपस्थित होते.