भरपाई : अवकाळीतील नुकसानीपोटीचा निधी वितरितगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊ स व गारपीट यामुळे जिवितहानी, शेतीपिकांचे नुकसान झाले, यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ कोटी २४ लाख ९० हजारांची मागणी केली होती. यापैकी ४० टक्के म्हणजेच ५ कोटी ८ लाख ३३ हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे. बुधवारी तो सात तालुक्याला वितरीत करण्यात आला. खरीपाला दोन आठवड्याचा अवधी असतांना मदत मिळणार असल्याने आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. अवकाळीने झालेल्या नुकसानीबाबत विशेषबाब म्हणून मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने १३ एप्रिल रोजी घेतला होता. ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादीत राहणार आहे. २८ फेबु्रवारी व १ मार्च रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे अमरावती, धामणगाव, भातकुली, चांदूरबाजार, अचलपूर, दर्यापूर व चिखलदरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा व संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासन निर्णयाला दीड महिना उलटून सुध्दा अंमलबजावणी नसल्यामुळे खरीपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आला होता. शेतीपिके, फळपिके व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत मदत मिळणार आहे. कोरडवाहू पिकासाठी १० हजार रुपये प्रती हेक्टर, सिंचनाखालील शेतीकरिता १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक फळपिकासाठी २५ हजार रुपये प्रतीहेक्टर, खरडून गेलेल्या जमिनीसाठी २० हजार रुपये प्रती हेक्टर मदत मिळणार आहे. कोरडवाहू व ओलीताखालील शेतीसाठी मदतीची किमान मर्यादा ७५० रुपये राहणार आहे. फळपिकासाठी १५ रुपये राहणार आहे. शासनाने निर्णयानुसार जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगीती, कर्जावरील तीन महिन्यांच्या कालावधीत व्याज माफ, तीन महिन्यांचे वीज बील माफी, परीक्षा शुल्कात माफी व दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफी या सवलती शासन निर्णयाने शेतकरऱ्यांना मिळणार आहे.मृतांचे वारस, जखमींनाही मदतअवकाळीने बाधीत ४९६ गावांमध्ये जिवितहानी देखील झाली आहे. भातकुली तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना प्रत्येकी अडीच लाख रुपये मदत मिळणार आहे. मृत जनावरांच्या मालकांनाही मदत मिळणार आहे.
पाच कोटींची मदत
By admin | Updated: May 28, 2015 00:17 IST