अमर हबीब : शेतकरी कायदेविषयक परिषदेतील सूर वरूड : शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांमध्ये संघटन नसल्याने आता शेतकऱ्यांनी कंपन्या तयार करून कृषिमालाची विक्री करण्याची वेळ आली आहे. सुविधा आणि फायदे जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी सुखी, समाधानी होणार नाही. जगाचा पोशिंदा जगला पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कायदे करून सरकारने केलेले कायदे मोडीत काढले पाहिजे, असे प्रतिपादन किसानपुत्र समितीचे अध्यक्ष अमर हबीब यांनी स्थानिक काठीवाले सभागृहात आयोजित शेतकरी कायदेषियक परिषदेत केले. देशात अन्न पिकविणारा शेतकरी आहे. कारखानदाराला कर्ज दिल्यांनतर बुडीत असले तरी जप्ती केली जात नाही. मात्र शेतकऱ्यावर कर्ज असले तर मानहाणीचे प्रकार घडतात. यातूनच शेतकरी आत्महत्या करतो. कारखानदाराकरिता सिलिंग कायदा नाही. मात्र मातीतून अन्न पिकविणाऱ्या शेतकऱ्याकरिता सिलिंगचा कायदा करून शेती बळकावण्याचे प्रयत्न सरकार करते. राजकीय नेते अॅट्रॉसिटी अॅक्टवर बोलतात. मात्र सिलिंंगच्या विरोधात का कधीच बोलत नाही. शेतकऱ्यांच्या मुळावरच घाव घालण्याचे काम सरकारच करीत असल्याचे आरोपसुध्दा करण्यात येऊन राजकारणात शेतकऱ्यांनी पाय रोवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही अमर हबीब यांनी पत्रपरिषदेत सांगितले. अध्यक्षस्थानी विचारवंत शेतकरी संघटनेचे नेते अमर हबीब, उदघाटक सहायक आयकर आयुक्त अभय देवरे, स्वागताध्यक्ष सत्यशोधक फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर आंडे, प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, शल्यचिकित्सक सुधाकर बंदे, शेतकरी नेते दिलीप भोयर, वासुदेव लांडगे, विकास हरडे, प्रमुख वक्ते जनमंचचे अध्यक्ष अनिल किल्लोर, शेतकरी आंदोलक गजानन अमदाबादकर, चंद्रकांत वानखडे, शरद पाटील, अच्युत गंगाणे, समाजप्रबोधनचे अध्यक्ष प्रवीण चौधरी, जायन्टस ग्रुपचे अध्यक्ष नितीन खेरडे आदी उपस्थित होते. शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतीमध्ये बंदिस्थता आली आहे. शेतकरी गुलाम होत आहे. जगाचा अन्नदाता पोशिंदा उपाशी असताना दुष्काळासोबत सामना करीत आहे, तरी सरकारचे याकडे दुर्लक्ष असल्याचे विचारवंतांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. अनिल किल्लोर यांनी शेतकऱ्यांना गळफास ठरलेले कायदे व घटना दुरस्त्या, शेतकरी आंदोलक गजानन अमदाबादकर यांनी शेती व शेतकऱ्यांच्या समस्या व समाधान, तर चंद्रकांत वानखडे यांनी शेतकरी आत्महत्येचे वास्तव, शरद पाटील यांनी शेतकऱ्यांनाा सवलती किती खऱ्या आणि किती खोट्या? या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांकरिता हिताचे रक्षण करणारे कायदे करणे गरजेचे असल्याचा सूर व्यासपीठावरून उमटत होता. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वॉटर कप स्पर्धेमध्ये पारितोषिक पात्र गावाच्या सरपंच, उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नितीन ठाकरे यांनी, तर आभार पुरुषोत्तम कळमकर यांनी केले. शेतकरी कायदेविषयक परिषदेकरिता सत्यशोधक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी कंपन्या तयार करणे गरजेचे !
By admin | Updated: September 7, 2016 00:21 IST