तिवसा : तालुक्यातील धारवाडा येथील वर्धा प्रकल्पबाधितांना १ कोटी ६८ लक्ष ७५ हजार रुपये इतके पुनवर्सन अनुदान मंजूर झाले आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने २०१२ पासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे.
धारवाडा येथे १७१ भूधारकांच्या घरांचे निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. ज्यांची शेतजमीन किंवा गावठाणातील घरे सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात आली असतील, अशा बाधितांना पुनर्वसन अनुदान देण्यात येते. धारवाडा येथील १४८ प्रकल्पबाधितांना अतिरिक्त पुनवर्सन अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात आली होती. २०१२ पासून ही मागणी प्रलंबित होती. बाधित झालेल्या १४८ प्रकल्पबाधितांना पुनवर्सन अनुदान देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तेथील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन ही मागणी शासनदरबारी पोहोचवून या बाबीचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे महसूल व वनविभागाकडून स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार धारवाडा येथील प्रकरणांत अंतिम निवाडा घोषित करण्यात आला आहे. या निवाड्यानुसार १४८ प्रकल्पबाधितांना पुनर्वसन अनुदान मिळणार आहे. पुनर्वसन अनुदानाची रक्कम निम्न वर्धा प्रकल्प, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडून विशेष भूसंपादन अधिका-यांना पुरविण्यात येणार आहे व त्यांच्याकडून ते संबंधितांना अदा करण्यात येईल.