वरूड : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान काही उमेदवारांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप तालुक्यातील घोराड येथील शेषराव कडू यांनी केला आहे.
सन १९९२ मध्ये आलेल्या महापुरात घोराड येथील घरे वाहून गेल्याने शासनाने त्यांना पुनर्वसित करून घरे दिली. परंतु, मूळ घराचा ताबा न सोडता अनेकांनी दोन्ही घरे ताब्यात ठेवली. काहींनी नवीन घरे विकली. ते जुन्याच घरात वास्तव्य करीत आहेत. निवडून आलेला सदस्य अतिक्रमण करून राहत असेल तर त्यांना निवडणुकीतून अपात्र करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. यामुळे खोटे प्रतिज्ञापत्र देऊन निवडणूक आयोगाची दिशाभूल करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाईची मागणी करणारी तक्रार शेषराव कडू यांनी तहसीलदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे.