मुख्याधिकारी रस्त्यावर : कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
धामणगाव रेल्वे : शहरात वाढत्या रुग्णांची संख्या पाहून दररोज ५ वाजतानंतर सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई केली जाणार आहे. विनामास्क व अधिक प्रवासी असलेल्या ऑटोरिक्षा व चारचाकी वाहनांवर कारवाई न केल्यास नगर परिषद कर्मचाऱ्यांचा निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे निर्देश मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी दिले आहेत.
धामणगाव शहरात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत आहे. पोलीस प्रशासन व नगर परिषदेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. नगर परिषद कर्मचारी जर व्यवस्थित काम करीत नसेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. दिवसभर शहरात एखाद्या दुकानावर गर्दी दिसल्यास ते दुकान सील करणे गरजेचे आहे. नेमलेल्या पथकाने ही कारवाई करणे महत्त्वाचे आहे. ही कारवाई योग्य पद्धतीने झाली नाही, तर संबंधित कर्मचाऱ्यांना दोषी ठरविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी उरकुडे यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी सायंकाळी मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: रस्त्यावर उतरून विनामास्क वाहनधारकांवर कारवाई केली. दरम्यान, आमदार तथा नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी नगर परिषदेच्या सर्व विभागांची ऑनलाइन बैठक घेतली.