राजू शेट्टी : गडकरींनी करावा खुलासा, पत्रपरिषदेत मागणीवरूड : मोर्शी-वरुड तालुक्यात शेतकऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. कर्जदार शेतकऱ्यांकडे भाडोत्री गुंड पाठवून वसूलीचे सत्र सुरु आहे. यातूनच शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाण्यासही मागेपुढे पाहणार नाही. राज्यात विरोधी पक्ष मूग गिळून बसला आहे. आता आम्हीच सत्ताधारी आणि आम्हीच विरोधी असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी दबावगट तयार करुन विविध योजना मंजूर करणे आवश्यक आहे. विकास कामाला आमचा विरोध नाही. परंतु उद्योगाच्या नावाखाली आवाज नाही, सरकार शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे उभारत असेल तर ते थडगे कुणासाठी याचा खुलासा ना. नितीन गडकरी यांनी करावा असा आरोप खा. राजू शेट्टी यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केला.ते पुढे म्हणाले, आमचे सरकार घोटाळेबाज नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी सोफियाला दिले. परंतु शेतकऱ्याला काय मिळाले. आय.आर.बी.चा टोल नाका वारेमाप वसूली करीत आहे. शासनाने वरुड मोर्शीतील वाहनधारकांना सर्व्हिस रस्ता टाकून द्यावा, अन्यथा टोलमुक्त करावे असेही त्यांनी सांगितले . दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला . कर्जाच्या वसूलीसाठी येणाऱ्या फायनान्स कंपनीच्या गुंडांवर कुठलीही कारवाई होत नाही. उलट शेतकऱ्यांना तगाद्यामुळे आत्महत्या करावी लागते. आता स्वाभीमानी शेतकरी संघटना हे खपवून घेणार नाही असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले. भूमिअधिग्रहनाबाबत बोलतांना ते म्हणाले, शेतकरी विरोधी धोरणाला सरकारला कधीही पाठिंबा देणार नाही. उद्योगपतींना देण्यात येणाऱ्या जमिनीसाठी भूमिअधीग्रहण कायदा आणू पाहत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही . कर्ज मुक्ती संषर्घ यात्रा सुरुच राहणार असून शेतऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शांत राहणार नाही. ना. नितीन गडकरी यांचे जरी समर्थन असले तरी आमचा स्वत:चा पक्ष आहे आमची ध्येय धोरण असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेतून बाहेर पडावे लागले तरी चालेल असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. यावेळी सदाभाऊ खोत तसेच वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविंकात तुपकर सुध्दा उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे
By admin | Updated: May 31, 2015 00:04 IST