वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी शिवारात विहिरीवरील मोटरपंप बंद का झाले, हे तपासण्यासाठी खांबावर चढलेल्या मजुराचा वीजतारांच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना कापूसतळणी येथे घडली. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
सूत्रांनुसार, कापूसतळणी शिवारात रत्नापूर येथील गजानन पाथरे यांच्या शेतात मोटरपंप बंद असल्याने त्यांनी कामावरील मजूर अनिल गिरनाळे (४६, रा. रत्नापूर) यांना खांबावर चढून तपासणी करण्यास सुचविले. मात्र, वीजपुरवठा बंद झालेला नव्हता. त्या तारांचा गिरनाळे यांना स्पर्श झाला आणि ते खांबावरून थेट जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. वृत्त लिहिस्तोवर शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला होता. तूर्तास याप्रकरणी कुठलीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली नव्हती.