गणेश देशमुख अमरावतीअमरावती महापालिकेत जादू घडली आहे. महापालिकेच्या नेत्यांचे गर्दीने भरून वाहणारे कक्ष आता ओस पडले आहेत. महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कक्षातील गर्दी मात्र आवरेनासी झाली आहे. महापालिकेत महापौर, उपमहापौर, विरोधीपक्षनेता, पक्षनेता, गटनेता, पाच सभापती आणि स्थायी समितीचे सभापती यांची दालने आहेत. महापालिकेच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या महापालिका नेत्यांची ही दालने एरवी सामान्य जनतेच्या गर्दीने फुल्ल असायची. सत्ता कुणाचीही असो, आयुुक्त कुणीही असोत, महापालिकेत सहजगत्या कामे होत नसल्याचा अनुभव अमरावतीकरांच्या गाठीशी असल्याने कामे करवून घेण्यासाठी सामान्यजन महापालिका नेत्यांच्या दालनात सकाळपासून गर्दी करायचे. महापौरांचा मान सर्वोच्च असल्यामुळे थेट त्यांच्या दालनात नागरिक पोहोचत नसले तरी पक्षनेता, गटनेता, विरोधी पक्षनेता, यांची दालने लोकरेटा अनुभवायची. नेतृत्त्वाच्या नैसर्गिक तत्त्वानुसार, दालनात रोजच होणारी गर्दी बघून नेत्यांना त्यांचे नेतृत्त्व लोकोपयोगी असल्याची खात्री पटत असे. बहरलेल्या नेतृत्त्वाच्याच त्या खुणा होत्या. गर्दीमुळे नेत्यांना हुरूप यायचा. आपल्या दालनात आलेला प्रत्येक नागरिक समाधानी होऊनच परतावा, असा प्रामाणिक प्रयत्न हे महापालिका नेते करायचे. महापालिका राजकारणात मांड घट्ट करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असल्याचे महापालिकेतील नेत्यांनी हेरले होते. दालनात आलेल्या व्यक्तीचे काम व्हायलाच हवे, असा कटाक्ष ही नेतेमंडळी ठेवायची. काम झाले नाही तर प्रशासनाला ते जाबही विचारायचे. काम व्हायचे. 'भाऊचे महापालिकेत वजन आहे' अशी चर्चा मग सामान्यांमध्ये व्हायची. महापालिका राजकारणाचा हा रोजचा चेहरा होता. महिना झाला, चित्रच पालटले. नेत्यांची दालने सुनसान आहेत. सारी गर्दी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या दालनाकडे चुंबकाप्रमाणे खेचली गेली. समस्या निवारणासाठी थेट महापालिका आयुक्तांना भेटण्याचा सामान्य माणसाने कधी विचारही केलेला नव्हता. महापालिकेचे अधिकारी, कारकूनच नीट बोलत नाहीत, मग आयुक्तांकडे नालीची, दिवाबत्तीची, जन्ममृत्यू प्रमाणपत्राची, रस्त्यावर म्हशी बांधल्याची तक्रार न्यायची तरी कशी? हाकलूनच लावतील ते, हीच सामान्यांची धारणा होती. मोठी समस्या घेऊन कधी कुणी आयुक्तांकडे जायची हिम्मत केलीच तर आयुक्तांच्या दालनाबाहेर बसणारा शिपाई प्रथम कामाची चौकशी करणार. त्याचा कवडीचाही संबंध नसताना त्याला माहिती द्यावी लागायची. नवख्या माणसाला तेथील रिवाज माहिती नसल्याने हा शिपाई नंतर त्याला आयुक्तांच्या स्वीय सहायकांकडे पाठविणार. चेहऱ्यावर जराही हास्य न ठेवणारी ही सहायकद्वय मंडळी 'कशालाच आला?' असा कटाक्ष आगंतुकावर टाकणार. त्यांना सविस्तर काम सांगायचे. शक्य झाले तर ते साहेबांकडे जाण्याची व्यवस्था करणार अन्यथा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याकडे रवानगी करणार. कमी जास्त प्रमाणात हीच स्थिती नेहमीच कायम राहिल्याने आयुक्तांच्या दालनात जाणे म्हणजे जणू मोहीम सर करणेच होते. नसल्या भानगडीत पडण्याऐवजी नेत्यांकडून कामे करवून घेणेच सामान्यजन पसंत करायचे.
गर्दी : नेत्यांच्या कक्षात जमेना; आयुक्तांच्या दालनात आवेरना !
By admin | Updated: May 19, 2015 00:37 IST