अमरावती : ‘बर्ड फ्लू’ हा सांसर्गिक रोग असल्याने अधिसूचनेप्रमाणे मृत पक्षी उघड्यांवर टाकणे जनआरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात याविषयीची तक्रार नोंदविली असता, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ व नियमावली बर्ड फ्लू सुधारित २०२१ नुसार, मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे बंधनकारक आहे. मात्र, अज्ञात व्यक्तीने छत्री तलाव ते भानखेड मार्गावर जेवड बीट वडाळी येथे ११ फेब्रुवारीला ५० मृत बायलर प्रजातीच्या ४५ ते ५० दिवस वयाच्या कोंबड्या फेकून दिल्याचे वनरक्षकाच्या निदर्शनात आले. या मृत कोंबड्यांचा रीतसर पंचनामा करून दोन पक्ष्यांचे नमुने एच-१ व एन-१ चाचण्यांकरिता पुणे व भोपाळ येथे पाठविले असता, अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आलेला आहे. या परिसरात पोल्ट्री रोगाचे सर्वेक्षण करण्यात आले. यात डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ पुंडलिक माकोडे, माहुलकर, पायधन, चंदनसिंग राजपूत, डॉ. मिलिंद राऊत आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. तपासणी व नमुने घेतेवेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय राहाटे उपस्थित होते.
पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता १९/१६० अंतर्गत कलम २६९,२७० व १८८ अन्वये व साथीचे रोग अधिनियम १८९७ अंतर्गत कलम ३ व ४ अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बॉक्स
पशुसंवर्धन विभागातर्फे रोग सर्वेक्षण
साथीचा रोग पसरू नये याकरिता भानखेडा व अंजनगाव बारी परिसरात १० किमी परिघातील पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे नमुने घेऊन जैवसुरक्षेबाबत त्यांना अवगत करण्यात आले. कुठेही या रोगाची लक्षणे दिसून आलेली नाहीत. या मोहिमेत पशुसंवर्धन विभागाच्या आरआरटी टिमने सर्वेक्षण केले. यात पाच डॉक्टर सदस्य होते. जिल्हा पशुसंर्वधन सर्व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त संजय कावरे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली.
कोट
बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोग सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. परिसरात किंवा फार्मवर कुठेही लक्षणे दिसून आलेली नाहीत. जैवसुरक्षा पाळण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- डॉ. मोहन गोहत्रे,
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त