जनाक्रोश आंदोलन : एकजूट दखलनीय, जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्तीअमरावती : सर्वसामान्य लोकांना वेठीस धरून नोटबंदी केवळ उद्योगपतींकडून पैसा मिळविण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या जनाक्रोश आंदोलनातून शनिवारी करण्यात आला. नोटबंदीने देशात आर्थिक अराजकता निर्माण केल्याची टीका यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली. शहर तथा जिल्हा काँग्रेसकडून शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंचा जनाक्रोश मोर्चा धडकला. मोदी सरकारविरुद्ध देशात सर्वदूर उसळलेल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.यंदा कापूस असो वा सोयाबीन, कांदा असो वा टोमॅटो साराच शेतमाल मातीमोल भावाने विकला जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या भावनेशी कुठलेही सोयरसुतूक नाही. शासन अस्तित्वातच नसावे, अशी स्थिती आहे. अद्यापपर्यंत कोलमडलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या भावावर करवाई केव्हा?- यशोमतीआ.यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या शिक्षक मामेभावाच्या प्रकरणाचा जाब विचारला. अंजनगाव बारी येथील शाळेत शिक्षक असलेले मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ राहुल कलोती हे तीन वर्षांपासून शाळेत गैरहजर आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा आ.ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सीईओंकडे अहवाल आला आहे. ते कारवाई करतीलच. त्यांनी न केल्यास मी करेन, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. भाजप सरकारकडून भ्रमनिरास : आ. जगतापतूर, सोयाबीन आणि कापसाची विक्री बेभाव होत आहे. १२ हजारांची तूर ३६०० वर आलीय. तिकडे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी करण्यात आल्याचा दावा पीएम करतात. किती काळा पैसा जमा झाला, असा सवाल आ. वीरेंद्र जगताप यांनी उपस्थित केला. नोटबंदीच्या काळात भाजप नेत्यांचा भ्रष्टाचार उघड झाला. जिल्ह्यात किती काळा पैसा जमा झाला, अशी विचारणा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. तीन वर्षानंतर पहिल्यांदाच बरे पीक आले असताना भाव नसल्याने शेतकरी आत्महत्यांकडे वळलाय, मात्र सीएम, पीएमला उसंत नसल्याची टीका त्यांनी केली. -तर मोदीच सुपरस्टार असते : खोडकेमोदी १५-२० वर्षे आधी पंतप्रधान झाले असते, तर अमिताभऐवजी तेच सुपरस्टार असते, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात खोडके यांनी कामगारांचा मुद्दा लावून धरला. नोटाबंदीनंतर कामगारवर्ग किती कमी झाला, कितीजण बेरोजगार झालेत, याची माहिती आपण शासनाला पाठविली काय? असा सवाल त्यांनी केला. नोटबंदीमुळेच रेमण्डचा प्रोजेक्ट सहा महिने पुढे ढकलला गेल्याची माहिती त्यांनी दिली. जनधन खात्यातूनही विथ्ड्रॉल होत नसल्याचे वास्तव त्यांनी मांडले.ग्रामीण जनता हवालदील- देशमुखकापूस, सोयाबीन उत्पादकांसह ग्रामीण जनता नोटबंदीमुळे हैराण झाली असताना त्यांच्यावर आता आत्महत्येची वेळ येऊन ठेपली आहे. शेतकऱ्यांची दुरवस्था, त्यांच्या शेतमालाला मिळत असलेला अत्यल्प भाव, बँकांमधील खोळंबलेले व्यवहार यामुळे ग्रामिणांचे कंबरडे मोडले आहे. जिल्हा बँकेवर मर्यादा घातल्याने सहकार क्षेत्रावर सुल्तानी संकट कोसळले असताना मोदी, फडणवीस सरकार आश्वासनांच्या फैरी झाडत असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला. त्यांनी आक्रमक शैलीमध्ये सरकारचा निषेध केला.मायक्रो फायनांसचा अहवाल आरबीआयकडेआ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, बबलू देशमुख यांनी मायक्रो फायनांसच्या पठाणी वसुलीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मायक्रो फायनांस बाबतचा अहवाल आरबीआयकडे पाठविल्याचे गित्ते यांनी स्पष्ट केले. याशिवाय तूर पिकाचे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान असून त्याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश ५ जानेवारीलाच दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.टाळ-मृंदगाचे भजनकाँग्रेसच्या मोर्चाला इर्विन चौकातून दुपारी १२ च्या सुमारास सुरुवात झाली. येथे ज्ञानबा रुखमाईसह, विठ्ठल माझा ही भजने गायली गेली. टाळ-मृंदगाच्या साथीने मोर्चाच्या मार्गावर विविध भजने करण्यात आली. २० ते २५ काँग्रेसी कार्यकर्त्यांनी एक सूर एक ताल धरत हरिनामाचा गजर करून मोर्चाला वेगळीच रंगत आणली.मोदी सरकार चोर है....आ. यशोमती ठाकूर यांनी हुंकार भरत मोर्चात रंगत आणली. प्रश्नोत्तराच्या सुरात त्यांनी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्यात. 'गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है पासून मोदी सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वरती पाय, जयहिंद, शेतकरी उपाशी सरकार तुपाशी, अशा गगनभेदी घोषणा देत काँग्रेसजनांनी मोर्चा गाजवला.
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस आक्रमक
By admin | Updated: January 8, 2017 00:04 IST