अमरावती : राज्यात ई-पंचायत प्रकल्पांतर्गत सर्व ग्रामपंचायतीमध्ये संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) कार्यरत आहे. या प्रकल्प अंमलबजावणीची यंत्रणा म्हणून महाआॅनलाईन या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे ई-पंचायत प्रकल्प पूर्णत: बारगळला आहे व यामध्ये ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा बळी जात असलेल्या निषेधार्थ जिल्हा ग्रामपंचायत संगणक परिचालक संघाने जिल्हा परिषद व विभागीय आयुक्त कार्यालयावर गुरुवारी निदर्शने केली. ई-पंचायत प्रकल्पामुळे महाराष्ट्र शासनाला सलग ३ वेळा केंद्र शासनाचा या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे देशात महाराष्ट्राचा प्रकल्प आदर्श मानला जात आहे. याचे श्रेय संगणक चालकांना आहे. मात्र संगणक परिचालकांना महाआॅनलाईनच्या बेपर्वा धोरणामुळे अनियमित केले जात आहे. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे व मासिक मानधन १५ हजार रुपये देण्यात यावे. कामावरुन कमी केलेल्या संगणक परिचालकांना पुन्हा कामावर रुजू करुन घेण्यात यावे व उर्वरित थकीत मानधन २ ते ३ दिवसात देण्यात यावे या मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. यामध्ये जिल्हाध्यक्ष अमोल वाडी, उपाध्यक्ष गणेश वानखडे, अमोल ढवळे, सचिव मनीष वानखडे, सहसचिव श्याम गायन, कार्याध्यक्ष सागर राऊत, जिल्हा संघटक दीपक बनारसे यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संगणक परिचालकांची विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक
By admin | Updated: July 24, 2015 00:13 IST