अमरावती: भातकुली तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींमधील २६९ जागांसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाचे सोमवारी निकाल लागले. अमरावती शहरातील फ्रेजरपुरा स्थित महापालिकेच्या शाळेत सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी १२ पर्यंत सर्वच ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. त्यामध्ये गावपातळीवरील विविध पॅनेलने बाजी मारली. यात कॉंग्रेस, भाजप, शिवसेना व युवा स्वाभिमानप्रणीत पॅनेलने बाजी मारल्याचा दावा करण्यात आला. प्रतिदावेदेखील करण्यात आले. ही निवडणूक राजकीय पक्षांच्या बोधचिन्हांवर लढविली जात नसल्याने कोणत्या ग्रामपंचायतवर नेमक्या कोणत्या पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले, हे सांगणे तूर्तास तरी कठीण आहे. मात्र, या निवडणुकीत बुजुर्गांना आव्हान देत तरुणाई रिंगणात उतरली होती. त्या तरुणाईने गावातील प्रस्थापितांना पराभूत करून गावातील प्रथम सभागृह गाठल्याचे आश्वासक चित्र आहे. भातकुली तालुक्यातील काही गावे बडनेरा विधानसभा मतदारसंघातदेखील येतात. निवडून आलेल्या उमेदवारांनी एकच जल्लोश केला.
---------------------------