सहविचार सभा : अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थितीअमरावती : शिक्षणाचे काम उत्तमरीतीने पार पाडण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे प्रशासन मजबूत असले पाहिजे. प्रशासनाच्या गुणवत्तेवरच शिक्षणाचा दर्जा अवलंबून असतो, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केले. अमरावती विद्यापीठात कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांची सहविचार सभा शनिवारी पार पडली. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा नियंत्रक जे. डी. वडते, विद्यापीठ ग्रंथपाल मोहन खेरडे, विद्यापीठ आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष अशोक चव्हाण, विद्यापीठ मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष नितीन कोळी व विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यापीठातील के.जी. देशमुख सभागृहात आयोजित या सभेत कुलगुरूंनी सर्वांशी संवाद साधला. ते म्हणाले, संत गाडगेबाबांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्यच समजतो. विद्यापीठाला मिळालेला 'अ' दर्जा टिकवून तो वाढवायचा आहे, त्यासाठी सर्वांच्या सहकाऱ्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची प्रगती साधण्याचे ध्येय घेऊन आपण अमरावतीत आलो आहोत. येथील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्यास हे ध्येय निश्चितच गाठता येईल, असा विश्वास यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केला. यावेळी विद्यापीठातील अनेक समस्या, अडचणींवर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठ ग्रंथपाल मोहन खेरडे, परीक्षा नियंत्रक जे.डी.वडते, आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मागासवर्गिय संघटनेचे अध्यक्ष नितीन कोळी व विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी मुरलीधर चांदेकर यांचे कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल स्वागत केले. सहविचार सभेला विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)
कुलगुरूंचा कर्मचाऱ्यांशी संवाद
By admin | Updated: June 21, 2016 00:15 IST