अंजनगाव तालुक्यात पिकांवर ढगांचा महिरप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 05:00 AM2020-11-29T05:00:00+5:302020-11-29T05:00:32+5:30
ढगाळ वातावरण असतानाच अंजनगाव व अचलपूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे कापूस ओला होऊन पिवळा पडत आहे. फुटण्याच्या अवस्थेत असलेली बोंड किडत आहेत. पावसाने तुरीची फुले गळत असून, अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, अर्धेअधिक तुरीचे दाणे अळ्यांच्या घशात जात आहेत, शिवाय या दूषित वातावरणाने रबी हंगामातील हरभरा व कांदा या पिकांनासुद्धा हानी पोहचत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : दहा-पंधरा दिवसांपासून अंजनगाव तालुक्यात पिकांवर ढगांचा महिरप सजला आहे. मात्र, तो महिरप पिकांवरील अळ्यांसाठी पोषक असल्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे. खरीप हंगामातील शिल्लक असलेला कापूस व तूर आणि रबी हंगामातील हरभरा व कांदा पिकाला या वातावरणाचा फटका बसत आहे.
ढगाळ वातावरण असतानाच अंजनगाव व अचलपूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे कापूस ओला होऊन पिवळा पडत आहे. फुटण्याच्या अवस्थेत असलेली बोंड किडत आहेत. पावसाने तुरीची फुले गळत असून, अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, अर्धेअधिक तुरीचे दाणे अळ्यांच्या घशात जात आहेत, शिवाय या दूषित वातावरणाने रबी हंगामातील हरभरा व कांदा या पिकांनासुद्धा हानी पोहचत आहे. कांद्याचे रोप तयार करण्याची प्रक्रिया वांदयात आली आहे.
कांद्याला फटका
अतिशय संवेदनशील असलेल्या अंकुरलेल्या कांद्यावर ढगाळ वातावरणाचा दुष्परिणाम होऊन ते जळत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. पूर्वी अतिपावसाने खरीप हंगामाचे वाटोळे केले. आता रबी हंगामालासुद्धा वातावरणाचा फटका बसणार आहे. तालुक्यात रबी हंगामाची पेरणी पूर्ण झाली. मात्र, तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. हरभऱ्यावर घाटेअळी व मर, तुरीवर शेंगा पोखरणारी अळी व माशा तसेच कांदा पिकावर करपा व फुलकिडे आहेत.